काल पुण्यातील बालगंधर्व सभागृह येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना यावेळी बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलल्याने सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.’भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं ? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान – सन्मान केलेला आहे. ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का ?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आजच्यानंतर जर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेच्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात न्यायालयात केस करेन आणि त्याचे हात तोडू.’ असं सुप्रिया सुळे यांनी खडसावून सांगितले.
या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडले आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महागाई विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे. या प्रकरणात आता भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम