देवळा : देवळा तालुक्यात रविवार दि.१८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थेट सरपंचांच्या ११ जागांसाठी ३० उमेदवार तर बारा ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या ७७ जागांसाठी १६१ उमेदवार मतदारांचा कौल अजमावणार आहेत. यासाठीची मतदार संख्या एकूण २८ हजार ८७१ इतकी आहे.
गेले आठ-दहा दिवस चाललेला जाहीर प्रचार काल शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संपला असून अंतिम टप्प्यात सोशल मीडियावर तसेच फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटीतून संपर्क साधत विरोधांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न होताना दिसून येत आहे . तालुक्यातील मटाणे व भऊर येथील सरपंचपद बिनविरोध झाल्याने इतर ११ गावांच्या सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. सरपंच म्हणून निवडून येणाऱ्या उमेदवारांना तब्बल पाच वर्षे सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होता येणार असल्याने सरपंच पदासाठी कमालीची चुरस दिसून येत आहे.
फुलेनगर येथील सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाली मात्र सरपंचपदासाठी येथे दुरंगी लढत होणार आहे. ७७ सदस्य पदांसाठी १६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक होत आहे तेथे फलकबाजी करत निशान्या बिंबविल्या जात आहेत. गावपातळीवरील मतदान कमी असल्यामुळे काठावर विजय-पराजय होत असतो.
या पार्श्वभूमीवर एकेका मतासाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. ओल्या पार्ट्या, अर्थपूर्ण हालचाली यांमुळे या गावातील स्थानिक राजकारण शिगेला पोहोचले आहे. राजकिय पक्षाऐवजी वैयक्तिक हितसंबंध, भाऊबंदकी, मित्रपरिवार, नातेवाईक हे घटक अधिक प्रभावी ठरत आहेत. रविवार दि.१८ रोजी दिवसभर मतदान होणार असून मंगळवार दि.२० रोजी सकाळी १० वाजता देवळा तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रांवर उमेदवाराचे नाव व निशाणी लावून माहिती भरत मतदान यंत्रे तयार करत निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती – १३
मतदान केंद्रे – ५२
मतदान पथके – ६०
मतदान कर्मचारी : केंद्राध्यक्ष – ६०, मतदान अधिकारी – १८०, शिपाई – ६०, पोलीस कर्मचारी – ६० , निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – प्रत्येकी १३
मतदार संख्या : – पुरुष – १५३०२, स्त्री – १३५६९, एकूण – २८८७१
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : फुलेनगर, वासोळ, भऊर, खामखेडा, मटाणे, विठेवाडी, डोंगरगाव, वाजगाव, कणकापुर, श्रीरामपूर, सटवाईवाडी, चिंचवे, व दहिवड
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, तालुक्यात दारू विक्री बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे तूर्तास तळीरांमाची तारांबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम