ग्रामपंचायत निवडणूक 98 माघारी , 82 जागांसाठी 171 उमेदवार मैदानात

0
32

देवळा : वाखारी ता.देवळा येथील बिनविरोध निवड झालेले उमेदवार जल्लोष करतांना समवेत समर्थक कार्यकर्ते.(छाया -सोमनाथ जगताप )

देवळा :(सोमनाथ जगताप ) देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार (दि.२२) रोजी माघारीनंतर ३१० पैकी ९८ उमेदवारांनी माघार घेतल्याने ४१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. असे असले तरी यातील एकही ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध झाली नाही. १३ ग्रामपंचायतीच्या ८२ जागांसाठी १७१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली.

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४१ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित जागांसाठी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .काही ठिकाणी अखेरच्या क्षणापर्यंत बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यात यश मिळू शकले नाही. माघारीच्या आजच्या अखेरच्या दिवशी देवळा तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

बिनविरोध निवड झालेल्यात रामेश्वर ( ७ जागा ), सुभाषनगर ( ७ जागा ), कापशी( २ जागा ) , विजयनगर ( ३ जागा ), वाखारी (९ जागा), सावकी(१), पिंपळगाव (५ जागा), शेरी (३) तर वार्षी( ४ ) जागांचा समावेश आहे.

सर्वात प्रतिष्ठेच्या अशा पिंपळगाव ग्रामपंचायतीत जमनाबाई जाधव, दादाजी जाधव, संगीता वाघ, प्रकाश जाधव, ललिता पाटील हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उर्वरित ६ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .

वाखारी ग्रामपंचायतीत सर्वाधिक नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यात अलका पवार, बायजबाई वाघ, अश्विनी वाघ, कल्पना चव्हाण, रविंद्र वाघ, सुनीता गुंजाळ, विलास पवार, अक्काबाई वाघ, धुडकू आहिरे यांचा समावेश आहे. आता उरलेल्या चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत .

शेरी येथील सरला गांगुर्डे, भीमराव माळी, अंजना मोरे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उर्वरित ४ जागांसाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .

वार्षी ग्रामपंचायतीत विठाबाई शेवाळे, सुमन वाघ, संगीता पवार, छबाबाई माळी हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले तर उर्वरित पाच जागांसाठी दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

रामेश्वरला सुलोचना पवार, सुनील पगार, उज्वला पवार, शीतल पगार, अंबु गांगुर्डे, जया पगार, माई जाधव हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. आता दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

सुभाषनगर येथील ग्रामपंचायतीतही जितेंद्र पाटील, लिलाबाई आहेर, ललिता खैर, बाळू माळी, साहेबराव माळी, आशा माळी, विमल गांगुर्डे असे सात उमेदवार बिनविरोध झाल्यात जमा आहेत आणि एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

कापशी येथेही संजय माळी, गयाबाई जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथे सात साठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विजयनगर येथेही विजय पवार, हिरामण वाघ, आवड्याबाई वाघ हे निवडून आल्यात जमा आहेत आता तीन जागांसाठी सहा उमेदवार आहेत.

खुंटेवाडी ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सावकी ग्रामपंचायतीच्या १० जागांसाठी २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरला शिवले या एकमेव उमेदवार बिनविरोध झाल्या.

खुंटेवाडी, खर्डे, खडकतळे व गुंजाळनगर या गावांमध्ये बिनविरोध कुणाचीच निवड न झाल्याने येथे सर्व जागांसाठी निवडणूक होणार असल्याने राजकिय घडामोडींना वेग आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here