द पॉईंट नाऊ ब्युरो (बीड) : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात वाळू उपश्यामुळे झालेल्या खड्ड्यात बुडून चार अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही मुले नदीकाठी खेळायला गेली असतांना, हा दुर्दैवी प्रकार घडला.
गेवराई तालुक्यातील शाहजहानपुर चकला येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास ही चौघेही लहान मुले खेळण्यासाठी नदीकाठी गेली होती. मात्र या चौघांवर काळाने घाला घातला. ही चारही मुले 9 ते 12 वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या घटनेमुळे वाळू उपसा करणाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. त्यांच्या या अशा कामामुळेच बीडमध्ये चार मुलांचा हकनाक बळी गेला. यामुळे इथले ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या दुर्दैवी घटनेत बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे, अमोल संजय कोळेकर या मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेवराई तालुक्यात गोदावरी, सिंदफना या दोन्ही नद्यांमध्ये वाळू उपशाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे आजवर बरेच अपघात झाले आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम