नवी दिल्ली – फुटबॉलमधली सर्वोच्च संस्था असलेली ‘फिफा’ने काल रात्री अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. यासोबतच भारताचे येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षाखालील मुलींच्या विश्वचषकाचे यजमानपददेखील काढून घेतले आहे.
शिवाय भारताला दरम्यानच्या काळात कुठलीही आंतरराष्ट्रीय सामने खेळता नाही येणार. याचे कारण म्हणजे तिसऱ्या पक्षाने भारतीय फुटबॉल महासंघात वाढता हस्तक्षेप. नुकताच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने भारतीय फुटबॉल महासंघाला लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे आदेश दिले. ह्यामुळे फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याचे फिफाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने मे महिन्यात भारतीय फुटबॉल महासंघ बरखास्त करत खेळाचे नियोजन करण्यासाठी, महासंघाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी आणि गेल्या १८ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती तयार केली होती. याची शहनिशा करण्यासाठी, फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे एक पथक भारतीय फुटबॉल भागधारकांना भेटण्यासाठी भारतात आले. पथकाने एआयएफएफला जुलैच्या अखेरपर्यंत आपल्या कायद्यात सुधारणा करावी आणि १५ सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्यासाठी धोरण आखण्याचे सांगितले होते.
खरेतर, डिसेंबर २०२० मध्ये फुटबॉल महासंघाची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र घटनेतील काही सुधारणांवरील विरोधामुळे ही निवडणूक रखडली होती. आता न्यायालयाने येत्या महिन्याभरात निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते, पण तत्पूर्वीच महासंघावर निलंबनाची कारवाई झाली.
“एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार ग्रहण करण्यासाठी प्रशासकांची समिची स्थापन करण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर आणि एआयएफएफ प्रशासनाला दैनंदिन कामकाजाचे नियंत्रण मिळाल्यानंतर महासंघाचे निलंबन मागे घेण्यात येईल,” असे फिफाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
काय सांगतो फिफाचे नियम ?
फिफाच्या नियमांनुसार, सदस्य असणाऱ्या देशातील संस्थांमध्ये कुठलीही कायदेशीर अथवा राजकीय मध्यस्थी होता कामा नये. याच कारणास्तव फिफाने याआधीही पाकिस्तानसारख्या काही राष्ट्रीय संघटनांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम