नाशिक : पंचवटी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात काल सोमवार सायंकाळच्या लिलावात कोथिंबिरीला विक्रमी वीस हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. या विक्रमी भावामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत येत असलेल्या पालेभाज्यांना विक्रमी भाव भेटत आहे. त्यातच तालुक्यातील म्हसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे, गोवर्धन, दूगाव, धोंडेगाव, सिन्नर, निफाड, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर तसेच पुण्यातील खेड, मंचर आदी भागातून बाजार समितीत पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
काल सोमवारी (दि. २६) सायंकाळी पालेभाज्यांचे लिलाव झाले. त्यात साईधन कंपनीत पालेभाज्या घेऊन आलेल्या दिंडोरी तालुक्यातील नवळपाडा गावातील शेतकरी विनायक लक्ष्मण वाघिरे यांनी हे चायना कोथिंबीर घेऊन बाजार समितीत आले होते. यावेळी त्यांनी आणलेल्या कोथिंबीरीस तब्बल वीस हजार पाचशे रुपये शेकडा इतका विक्रमी बाजार भाव मिळाला. दरम्यान, सदर कोथिंबीर नितीन लासुरे या व्यापाऱ्याने घेतली असून ते मुंबई, गुजरात, सुरत येथील मार्केटला पाठविणार आहेत.
यावेळी शेतकरी विनायक वाघिरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, की माझे पाऊणेसहा एकर क्षेत्र आहे. पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे मी माझ्या शेतीत सद्यःस्थितीत कारले, कोथिंबीर, टॉमेटोची लागवड केली आहे. मात्र आज कोथिंबीरास मिळालेला बाजारभाव पाहून यामुळे माझ्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम