बागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ‘आनंद उत्सव’ मोठ्या दिमाखात संपन्न

0
104

स्वप्निल अहिरे,

प्रतिनिधी : नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना शाखा बागलाण यांचे वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने सुधारित किमान वेतन १ एप्रिल २०२२ पासून लागू केल्याबद्दल आनंद उत्सव सोहळ्याचे आयोजन मोरेनगर येथील आप्पाश्री लॉन्स येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मचारी महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सखाराम दुर्गुडे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बागलाण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रणव हिरे हे होते. उज्वलजी गांगुर्डे सरचिटणीस नाशिक जिल्हा, पंचायत समिती विस्तार अधिकारी नितीन देशमुख, भैयाजी सावंत, सूर्यवंशी बाबा, पाटील साहेब, ग्रामसेवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष के. बी. इंगळे, ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष एस. बी. भामरे, ग्रामसेवक संघटना सचिव संदीप खैरनार, ग्रामसेवक पतसंस्था संचालक योगेश भामरे, आदर्श ग्रामसेवक पंकज पवार, तालुका उपाध्यक्ष शरद सोनवणे, तालुका समन्वयक समीर जाधव, ग्रामसेवक निसार शेख आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर बागलांचे आराध्य दैवत संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन झालेनंतर तालुक्यातील पिंपळकोठे येथील मयत कर्मचारी पाटील यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सहसचिव नरेंद्र मोरे यांनी केले प्रास्ताविक पर भाषणात तालुका अध्यक्ष भिकाभाऊ जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा व त्यावर संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या वाटचाली याबाबत सांगितले. मनोगतपर भाषणात संघटना संघटक दादाजी अहिरे यांनी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनपटाबाबत थोडक्यात सांगत अगदी मार्मिकपणे आपल्या भावना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामसेवक संघटना जिल्हा उपाध्यक्ष इंगळे यांनी व विस्तार अधिकारी देशमुख यांनी ग्रामपंचायत कर्मचारी हा आमचा लहान भाऊ असल्याने दैनंदिन जीवनात त्यांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या पद्धतीने जी काही मदत लागेल ती सोडवण्यास आम्ही सदैव कटिबध्द असू, मात्र त्यांनी आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडावे असे सांगितले.

आदर्श ग्रामसेवक पंकज पवार यांनी माझ्या दैनंदिन जीवनात ग्रामपंचायत कर्मचारी माझ्यासाठी व मी त्यांच्यासाठी आदर्श असू पण प्रत्यक्षात ग्रामपंचायतीचा कर्मचारी ज्या पद्धतीने आपली जीवन जगतो ते खरोखरच दयनीय आहे परंतु शासनाने त्यांच्या आजवरच्या लढ्यास यश देऊन त्यांना किमान वेतन लागू करून त्यांचे जीवनमान उंचावले आहे व यापुढे ते आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतात.

अध्यक्षीय भाषणात दुर्गुडे यांनी संघटनेचे संस्थापक काँग्रेस राजाराम बाबा निकम यांचा जीवनपट सांगत त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सन्मान जनक जीवन जगता यावे यासाठी उभारलेल्या लढ्याविषयी सांगितले व आजवर किमान वेतनासाठी उभारलेले लढे व त्यांना संघटनेच्या माध्यमातून मिळालेले यश याविषयी सांगितले आजवरच्या पगारात देखील कर्मचारी आपला उदरनिर्वाह करीत होता परंतु यापुढे त्यास चांगले दिवस येतील कारण शासनाने सुधारित किमान वेतन मंजूर करून त्याचे १ एप्रिल २०२२ पासून देण्याचा अध्यादेश पारित केला आहे. कर्मचाऱ्यांनी जसे आजवर संघटित राहून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या तशाच यापुढेही राहून जिल्हा परिषद कर्मचारी दर्जा मिळणे कामे प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून पदाधिकारी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष भिकाभाऊ जाधव, उपाध्यक्ष दीपक अहिरे, सचिव संतोष शिंदे, सहसचिव नरेंद्र मोरे, संघटक स्वप्निल अहिरे, दादाजी अहिरे, गणेश बोरसे, निवृत्ती अहिरे, गोकुळ अहिरे आदींसह बागलाण तालुक्यातील सर्व कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here