– श्वेता वाळुंज
आपल्या भारतीय इतिहासात असंख्य क्रांतिकारक होऊन गेले आहेत. ज्यांनी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्याकरता मोठा संघर्ष केला. इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. तात्या टोपे हे त्यातलेच एक महान भारतीय स्वातंत्र्य सैनीक. भारताला ब्रिटीशांच्या गुलामीतून सोडवण्यासाठी पहिल्या लढाईत आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली.
तात्या टोपे यांचं मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे. महाराष्ट्रातलं येवला हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडील पांडुरंग हे वेदशास्त्र आणि एक ज्ञानी व्यक्ती होते. त्यामुळेच दुसऱ्या बाजीरावांनी त्यांना पुण्याला बोलावून घेतले. बाजीराव पेशव्याने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली व ती तात्या अत्यंत जपत असे. काही दिवस तात्या ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम करायचे. त्यावेळेपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम तात्या पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता. सु. ३० वर्षे त्यांनी मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे ते ब्रह्मवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस होता.
पेशवाईच्या समाप्तीनंतर बाजीराव ब्रह्मावर्तास गेले. तेथे तात्यांनी पेशव्यांच्या राजसभेत स्थान मिळवले. सत्तावन्नचा क्रांतीकाल जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे ते नानासाहेब पेशव्यांचे प्रमुख सल्लागारही बनले. सत्तावन्नच्या क्रांतीयुद्धात इंग्रजांना एकाकी ; पण सर्वांत परिणामकारक झुंज दिली, ती तात्यांनीच ! झाशीहून निसटून आलेल्या राणी लक्ष्मीबाइंनी पेशव्यांना ग्वाल्हेर जिंकायचा दिलेला सल्ला तात्यांनाही तो पटला.
ग्वाल्हेरचे शिंदे क्रांतीपक्षाला येऊन मिळण्यात उदासीन होते. त्यांनी क्रांतीकारकांसमवेतच युद्ध चालू केले; पण तात्यांना समोर पहाताच शिंद्यांचे सारे सैन्य तात्यांना येऊन मिळाले. तात्यांनी रावसाहेब पेशव्यांच्या आधिपत्याखाली ग्वाल्हेरला येथे एक स्वत:चे राज्यच उभारले. ३ जून १८५८ या दिवशी रावसाहेब पेशव्यांनी राजसभेत तात्यांना रत्नजडित तलवार देऊन सेनापतीपदाचा मान मिळवून दिला. १८ जून या दिवशी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि ग्वाल्हेरही इंग्रजांच्या नियंत्रणात गेले. कानपूर जिंकण्याचा तात्याचा अट्टाहास होता, तरी इंग्रजांची दमछाक करण्याची त्याची जिद्द होती.
यापुढे तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली. तात्यांना पकड करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील, पत्नी आणि मुले यांना अटकेत घेतले. तात्यांना पकडेत येण्याकरता तीन दिशांनी ६ इंग्रज सेनानी धडपडत होते; पण तात्या त्यांच्या विळख्यात येत नसे. यातील तीन सेनापतीना चकमा देऊन आणि पाठलागावर असणाऱ्या इंग्रज सैन्याची दमछाक करत २६ ऑक्टोबर १८५८ या दिवशी तात्या नर्मदा नदी पार करत दक्षिणेत पोहोचले. या घटनेला इंग्लंडमधीलच नव्हे, तर युरोपातील वर्तमानपत्रांनीही प्रमुख स्थान दिले. ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व पटवून देणारी होती.
सहस्रोच्या इंग्रज सैन्यावर हा वीर मूठभर सैन्यानिशीच आक्रमण चढवायचा. अत्यंत अवघड असलेला आणि तुटपुंजे सैन्यबळ असतांना तात्यांनी काल्पीचा किल्ला जिंकून इंग्रजांना आपल्या पराक्रमाची रेखा उमटविली . इतकेच नव्हे, तर तात्यांनी इंग्रज सैन्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या जनरल विंडहॅम या सेनापतीचा आणि त्याच्या सैन्याचा धुव्वा उडवला. तात्यांनी १० महिने एकट्याने इंग्रजांच्या नाकीनऊ आणले. तात्यांना पकडण्यासाठी शेवटी इंग्रजांना फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. ग्वाल्हेरच्या राजाविरुद्ध अयशस्वी बंड केलेल्या मानसिंगच्या करवी. सतत पराभव होऊ देखील तात्या अखेयपर्यंत डगमगले नाही.
७ एप्रिल १८५९ या दिवशी तात्यांना परोणच्या अरण्यात झोपेत असतांना पकडण्यात आले. १५ एप्रिल या दिवशी तात्यांचा अभियोग सैनिकी न्यायालयासमोर शिप्री येथे नेले. त्याचे धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. या न्यायालयाचा निकाल ठरलेला होता. १८ एप्रिल १८५९ या दिवशी सायंकाळी तात्या टोपे यांना ग्वाल्हेरजवळील शिप्री किल्ल्याजवळील पटांगणात फाशी देण्यात आले.सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या आणि गुलामगिरीशी लढणाऱ्या अतुलनीय योद्ध्याच्या स्मरणार्थ शिवपुरीच्या लोकांनी त्याच कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांची समाधी बांधली. तात्या टोपे यांच्या स्वातंत्र्यसंग्राम पराक्रमाला इतिहासात तोड नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम