उभ्या पिकातून शेतकऱ्यांची ‘अंत्ययात्रा’ ; रस्ता नसल्याने पवार कुटुंबियांवर ‘नामुष्की’

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : तालुक्यातील मौजे शेरी (लो.) येथे आज रविवार (दि.२९) रोजी रस्त्याअभावी अक्षरशः उभ्या पिकातुन अंत्ययात्रा काढावी लागली. यामुळे दुःख आणि समस्या यांना तोंड देण्याची वेळ येथील पवार कुटुंबीयांवर आली. गेल्या काही महिन्यांपासून पांदनरस्ता खुला करून मिळावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत . परंतु शासनदरबारी भिजत घोंगडे असल्याने रस्त्याचा प्रश्न कायम आहे.

शेरी ता देवळा : रस्ता नसल्याने येथील पवार कुटुंबियातील वाळू पवार यांची अंत्ययात्रा उभ्या पिकातून घेऊन जातांना नातेवाईक (छाया – सोमनाथ जगताप)

शेरी(लो) ता. देवळा येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातून जाण्या येण्यासाठी रस्ता नाही. गाव नकाशात याठिकाणी नैसर्गिक नाला असून तो सध्या बंद आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी हा नाला खुला करण्यात यावा यासाठी देवळा तहसीलदारांकडे मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली नाही. रस्त्याअभावी संबंधित शेतकऱ्यांना आपला शेतमाल एक ते दीड किलोमीटर अंतरावरून वाहून आणावा लागतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने या कामासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

यामुळे येथील शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील पवार कुटुंबियातील वाळू पवार यांचे काल (दि.२८) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा काढण्यासाठी रस्ता नसल्याने ती अक्षरशः उभ्या पिकातून काढावी लागली. यापूर्वी हा रस्ता खुला करून मिळावा या मागणीसाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. हा प्रश्न निकाली निघण्याची आस येथील शेतकऱ्यांना आहे. हा नाला प्रशासनाने रहदारीस खुला झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here