देवळा प्रतिनिधी : देवळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व महिला, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा समन्वय नसल्याने व या अधिकाऱ्यांच्या उदासिन भुमिकेमुळे तालुक्यातील अमृत आहार योजनेचे देयके थकल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
भारतीय जनता पक्षाने अमृत आहार योजनेच्या थकीत बिलांच्या संदर्भात आवाज उठवून गटविकास अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी यांना दोन दिवसांपुर्वी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासह त्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते.
गटविकास अधिकारी याप्रश्नी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. सहा महिण्यांपासुन अमृत आहाराच्या देयकांचे ३२ लक्ष रुपये निधी पंचायत समिती देवळा यांच्याकडे पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. केंद्र शासना कडून प्राप्त झालेला निधी संबंधित विभागाला त्वरीत कळवून तो तात्काळ वितरीत करणे अपेक्षित होते. हा संवेदनशील विषय गटविकास अधिकाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्याने त्याचा थेट संबंध पेसा क्षेत्रातील बालकांच्या आरोग्याशी येतो. शासनाने दिलेल्या निधीचा विनियोग न करता तो पैसा सहा महिने आपल्याकडे थांबवून ठेवणे, ही बाब गंभीर असून शासकीय नियमांचा भंग करणारी आहे, या संपूर्ण प्रकरणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत गटविकास अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे.
बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी देखील आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. गेल्या दहा महिन्यांपासून अमृत आहार योजनेच्या देयकांसंदर्भात अंगणवाडी सेविकांनी सातत्याने बालविकास अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता ती बाब गंभिरतेने न घेता उलट सेविकांची खिल्ली उडविली. सहा महिन्यांपासून जर सदर निधी पंचायत समिती कडे उपलब्ध होता तर त्या संदर्भात साधी चौकशी करण्याची तसदी देखील बालविकास अधिकारी यांनी घेतली नाही. शासकीय कामात अनियमितता तसेच अंगणवाडी सेविकांना वेठीस धरणे, केंद्र शासनाच्या योजनेस आडकाठी आणने या गंभीर बाबींखाली एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची देखील चौकशी झाली पाहिजे. असे शेवटी पत्रकात नमूद करण्यात आले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम