त्र्यंबकेश्वर, प्रशासकांवर इतकी मेहरबानी का ? : विश्वस्तांची निवड कधी ?

0
130

नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे देशविदेशातील कोटयावधी वारकरी भाविकांचे श्रध्दास्थान असून वारकरी संप्रदायाचेआद्य प्रवर्तक संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू व थोरले बंधु संत निवृत्तीनाथ महाराजांनी जेथे संजीवन समाधी घेतली त्या देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रदिर्घ कालावधी पासून प्रलंबीत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन असतांना 20 मे 2020 रोजी विश्वस्त मंडळाची मुदत संपुष्टात आली मात्र कोविड महामारीच्या कारणास्तव नव्याने जाहीरात निघाली नाही. डिसेंबर 2020 मध्ये विश्वस्तपदासाठी धर्मदाय उपायुक्त नाशिक यांनी अर्ज मागविले. तेव्हा 187 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती देखील जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवडयात घेण्यात आल्या. मात्र त्या मुलखतींचा निर्णय अद्याप लाल फितीत अडकून आहे. दरम्यान 1 फेबुवारी 2021 रोजी धर्मदाय सहआयुक्त जयसींग झपाटे यांनी नव्याने प्रकटन जाहीर केले व पुन्हा विश्वस्त पदासाठी अर्ज मागविले.

कार्यरत असलेले विश्वस्त मंडळ बरखास्त केले आणि तेथे प्रशासकांची नेमणुक केली. दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी असलेली संत निवृत्तीनाथांची यात्रा प्रशासकांच्या देखरेखी खाली झाली.

विश्वस्तपदासाठी आता पुन्हा नव्याने 185 व्यक्तींनी अर्ज दाखल केले. त्यानंतर 1 मार्च 2021 रोजी धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात विश्वस्तांच्या मुलखतींसाठी बोलावण्यात आले मात्र कोविड दुस-या लाटेची सुरूवात झाल्याचे लक्षात आल्याने मुलाखतींचा नियोजीत कार्यक्रम तहकुब करण्यात आला. तो आज तगायत तहकुबच राहीला आहे. वास्तवीक पाहता त्यानंतर काही महिन्यांनी वातावरण निवळले तसे न्यायालयीन कामकाज सुरू झाले. संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टच्या नंतर प्रक्रिया सुरू झालेल्या देवस्थानांचे विश्वस्त मंडळांच्या नियुक्त्या झाल्या मात्र संत निवृत्तीनाथ ट्रस्टच्या बाबत कोणताही निर्णय झाला नाही.

दरम्यान 26 ऑक्टोंबर 2021 रोजी वारकरी महामंडळाने धर्मदाय सहआयुक्त यांना विनंतू अर्ज सादर केला आणि संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा जिर्णोध्दार आणि परिसर विकास आराखडा राबविणे या करिता विश्वस्तांची नेमणुक तातडीने दाखल करण्याची मागणी केली. त्याच वेळेस खासदार हेमंत गोडसे यांनी देखील दुरध्वनीवरून धर्मदाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळेस येत्या दोनचार दिवसात कार्यक्रम लागेल असे अश्वासन देण्यात आले मात्र त्यानंतर काहीही हालचाल झालेली नाही.

दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने शासनाने यावर्षी देखील यात्रोत्सव रद्द केल आहे. मात्र वारकरी भाविक आजही संभ्रमावस्थेत आहेत. यात्रा रद्द झाली असेल परंतु शेकडो वर्षांपासून येणा-या वारक-यांच्या भावनेचा हा प्रश्न आहे. विश्वस्त मंडळ अस्तीत्वात असते तर आज हि वेळ आली नसती. यात्रा रद्द झाली मात्र प्रत्येक दिंडीतील निवडक वारक-यांना विणा ध्वजा देवता घेऊन नाथांच्या समाधीचे दर्शन घडले असते. याबाबत कोणताही ठोस कार्यक्रम अद्याप पर्यंत शासन आणि प्रशासक यांनी जाहीर केलेला नाही. मंदिराचे बांधकाम आता पुर्ण झाले आहे. परिसर विकास आराखडा काम मार्गी लावण्यासाठी विश्वस्त मंडळाची गरज भासते आहे.

संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर ट्रस्ट सदस्यांची निवड प्रकिया कोरोनाचे नियम पाळुन घेण्यास हरकत नाही. विश्वस्त मंडळ नेमणुक नसल्याने मंदिर परिसर विकास खोळंबला आहे. तसेच यात्राजत्रा कालावधीत नियोजनासाठी विश्वस्त मंडळ अस्तीवात येणे आवश्यक आहे.
– ह.भ.प.श्रावण महाराज आहिरे,
– जिल्हाध्यक्ष , वारकरी महामंडळ महाराष्ट्रराज्य
——–
विश्वस्त मंडळ नेमणे गरजेचं आहे , आम्हाला शब्द दिला नियुक्तीचा मात्र अद्याप निर्णय का घेतला जात नाही हे समजत नाही, विकास करताय हे कारण दाखवताय मात्र प्रशासक असतांना अनेक उणिवा राहिल्या, दोन वर्षे होतील आता जनतेचे प्रतिनिधी आले पाहिजे. कोरोनात इतर धर्मस्थळांचे ट्रस्ट होताय मात्र याठिकाणी हे निमित्त का होतंय हे समजणे कठीण झाले आहे. दोन दोन वेळा अर्ज करावे लागले यात खर्च झाला मनस्ताप झाला हे दुर्दैवी असून निर्णय घेणे गरजेचे आहे.
– हभप लहू महाराज अहिरे, सचिव नाशिक जिल्हा वारकरी महामंडळ


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here