उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथील मूळ रहिवासी असलेले डॉ.हर्षल तारे हे औषध निर्माण शास्त्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची डाॅक्टरेट ही मानद पदवी मिळवून असंख्य शिष्य घडवत आहेत. त्यांच्या आयुष्यातील ज्ञानाचे भांडार विद्यार्थ्यांसाठी खुले करुन विद्यार्थ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्यांच्या दैदीप्यमान वाटचालीचा घेतलेला हा धांडोळा.
डॉ.तारे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण शहरातच झाले. पुणे येथे बी. फार्म., एम. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. ते सतत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास मनाशी बाळगून असतात. याच प्रयत्नात असताना २०११ मध्ये सातारा येथे फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कामास सुरवात केली. पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेला प्रवास पुन्हा जन्मभूमीत अर्थात जळगावात पोहोचला. स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवत आत्मविश्वास प्रबळ असला की सर्वकाही शक्य आहे, असा विचार घेऊन वाटचाल सुरू असलेले डॉ. हर्षल तारे हे सकारात्मक विचारांतून विद्यार्थ्यांना घडविणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावारूपाला आले आहे. पुस्तकासोबतच, प्रयोगशील बादशहा म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. विद्यार्थ्यांना ज्ञान द्यायचे असेल तर आपली बुद्धिमत्ता तेवढी हवी. आपण जगाच्या स्पर्धेत ज्ञानाने टिकाव धरू शकतो. वाचन तर हवेच पण त्यासोबत प्रयोगशील असणे देखील गरजेचे आहे, असे म्हणत पुस्तकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे विद्यार्थ्यांना शिकायला मिळायला हवे. यासाठी डॉ. तारे प्रयत्नशील असतात. सामाजिक भान जोपासत युवकांनी वेगळे प्रयोग करायला हवे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. युवक पुस्तकी किडा नको बनायला, तो वैचारिक दृष्टीने समृद्ध असावा. त्याचा फायदा समाजाला होईल. स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करणाऱ्या युवकांची देशाला गरज आहे. आपण समाजातील युवकांना दिशा दाखविण्याचे काम केल्यास आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळेल, हा सामाजिक परिवर्तनाचा वसाच जणूकाही त्यांनी हाती घेतला आहे. महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून त्यांची ख्याती आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापक हे नाते तसा चर्चेचा विषय असतो. मात्र तारे हे तरुण मनाचे असल्याने विद्यार्थ्यांना देखील ते आपले मित्र म्हणून जवळचे वाटतात. विद्यार्थी- प्राध्यापक हे नाते भीतीपोटी जपले जाते, तर काही ठिकाणी स्वार्थासाठी विद्यार्थी प्राध्यापकांशी जवळीक करीत असतात. मात्र, डॉ. तारे यांच्याबद्दल हे सर्व अपवाद आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांचे मित्र मोठ्या प्रमाणात आहेत.
डॉ.तारे यांनी अनेक युवकांना व्यसनमुक्तीकडे नेले आहे. मित्रांचे सर्व लाड करेन मात्र व्यसनाचे नको हे ठामपणे सांगतात. डॉ तारे हे आयुष्यात मोठ्या पदावर गेले. तरी एक पाय जमिनीवर असावा, हा गुरुमंत्र त्यांनी कायम जपला आहे. आपल्या ओघवत्या वाणीने मित्रांना, विद्यार्थ्यांना क्षणार्धात आपलेसे करत असतात. विद्यार्थ्याशी मित्र म्हणून वागावे. जेणेकरून ते काही अडचणीत असतील, तेव्हा आपल्याला हक्काने सांगू शकतील. अनेक विद्यार्थी अडचणीत असतात, तेव्हा कोणाला काहीही मागू शकत नाहीत. चुकीचे पाऊल उचलतात. त्यापेक्षा प्रत्येक प्राध्यापकाने विद्यार्थ्याशी मित्र म्हणून वागावे असे डॉ. तारे सांगत असतात.
आपल्या व्यस्त आयुष्यातून बालपणाच्या मित्रांना देखील जपले आहे. अनेक मित्र आजही त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या आयुष्यात काही अडचणी असल्यास मदत करणे, मदतीला धावून जाणे हे सर्व कौटुंबिक नाते जपले आहे. आयुष्यात माणसे जोडायचे असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवत असतो व आपण ते आत्मसात केले पाहिजे. या तत्त्वावर त्यांनी आपले आयुष्य मित्रांसाठी समर्पित केले आहे. विद्यार्थ्यांना मित्र बनवायची कला देखील त्यांनी जपली आहे. चांगल्या कामासाठी माणूस जोडण्यासाठी कधीही कमीपणा वाटायला नको, हेही त्यांनी जपले आहे.
समाजाची नेहमीच कणव करत असतात. काही माणसे नावासाठी जगत असतात. परंतु, डाॅ. तारे हे या सर्व मायाजाळापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक बदल हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा वाटतो. परिवर्तनाचा वसा, प्रामाणिकपणा हा त्यांच्या अंगातच रुजलेला आहे. युवकांना संघटित करून व्यसनमुक्तीसाठी त्यांनी कार्य सुरू केले आहे. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांना आज व्यसनाने ग्रासले आहे. युवक हा देशाचा कणा आहे. जर देशाचा कणा वाईट सवयींमुळे खचला, तर देश अधोगतीच्या दिशेने जाईल. यामुळे आपण शक्य युवकांना चांगल्या मार्गाला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी त्यांचे कार्य सुरू आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ग्रामीण भागात युवकांना सोबत घेऊन वैद्यकीय जनजागृतीसाठी प्रयत्न केले. या त्यांना युवकांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन विविध आजारांवर माहिती देणे, त्यांच्या मनात वैद्यकीय सेवेबद्दल विश्वास निर्माण करणे, असे कार्य परिवर्तनासाठी अविरत सुरू आहे.
शिवरायांच्या अन विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन आयुष्यात वाटचाल करीत आहेत. आपण कोणाला मानतो, त्यांचे विचार आचरणात आणतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. समाजात वावरताना वेळ, वर्तणूक, आचार-विचार वास्तविक जीवनात राहणे हे जपणे अत्यंत महत्त्वाचे असते. डॉ. तारे यांनी नेहमी शिवरायांच्या अन स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी वाटचाल केली. महिलांचा सन्मान हा त्यांचा प्रमुख ‘अजेंडा’ असतो. महिलांना तुम्ही सन्मानाने वागणूक द्या, ही शिकवण विद्यालयांना ते नेहमीच देत असतात. समाजात तुम्ही काही केले नाही, तरी चालेल; पण आई-वडील व स्त्रियांचा सन्मान, आदर हा आयुष्यात जपणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल करायला हवे, तसेच तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा, तेव्हा तुम्ही समाजात ताठ मानेने वावरू शकाल. या चाटचालीत प्रत्येक टप्प्यावर अनेक चांगले वाईट अनुभव येतात. त्यातून शिकायला मिळते व त्यातून प्रत्येकाने सकारात्मक विचार आचरणात आणायला हवेत. प्रत्येक टप्प्यावर लाभणारे मार्गदर्शक गुरू म्हणून दिशादर्शक ठरतात. डॉ. तारे हे नाव अनेक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक समूह वाटचालीसाठी कारणीभूत ठरणारा चेहरा संस्मरणीय बनला आहे.
(डॉ. हर्षल लिलाधर तारे, जळगाव)
जन्मतारीख : ५ जानेवारी, १९८८
शिक्षण : एम. फार्मसी, एमबीए, पी. एच. डी. (डाॅक्टरेट)
अभ्यासदौरा : ओडिसा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक
आवड : बॅडमिंटन, स्वीमिंग, परिवार एक कुटुंब
मिळालेले पुरस्कार –
२००९ : स्टुडंट ऑफ दि इयर, शिरूर
२०११ : राष्ट्रीय इंटरकॉलेजिएट फार्मा पुरस्कार (ओडिसा)
२०१२ : एक्सलन्ट टिचर अॅवॉर्ड (गौरीशंकर शिक्षण संस्था, सातारा)
२०१५ : सम्मान २०१६ उत्कृष्ट प्राध्यापक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे.
२०१७ : प्राउड ‘सपोर्टर’ सन्मान.
२०१८ : सकाळ एक्सलन्स इन एज्युकेशन.
२०१९ : उत्कृष्ट प्राचार्य (मुद्रा सोल्युशन कंपनी).
2021 : युवा शास्त्रज्ञ पुरस्कार, उत्तर प्रदेश
—–
सध्या औरंगाबाद येथे एमजीएम विद्यापीठात व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधन डॉ. पूजा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
डॉ तारे यांचे योगदान
• संशोधन क्षेत्रातील 23 पुस्तक पब्लिश
• आजपर्यंत 137 शोध निंबध सादर केले आहेत.
• वेगवेगळ्या क्षेत्रातील 2 पेटंट मिळाले आहेत.
• दहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावरील सांघिक विजेतेपद
प्रेरणादायी युवा…
आजच्या पिढीसमोरील शिक्षण क्षेत्रातील आव्हाने नेमकी काय आहे? याचा उहापोह मान्यवरांकडून होतो. यात प्राचार्य डॉ. तारे यांचा अभ्यास दिसून येतो. प्रेमाने जग जिंकता येते, यात विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसाठी अभ्यासपूर्ण विवेचनातून अनेक प्रभावी उपाययोजना डॉ. तारे यांनी विविध कार्यशाळा महत्त्वपूर्ण बैठका आदींमध्ये मांडल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम