– अंकुश सोनवणे
द पॉईंट नाऊ : नाशिक जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या देवळा तालुक्याला ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर पोलीस निरीक्षकच नसल्याने कायदा-सुव्यवस्था हाताळण्यात येथील पोलीस यशस्वी ठरतील का ? त्यांच्यावर असलेला वाढीव ताण निवडणुका शांततेत पार पाडण्यास अडसर तर नाही न ठरणार असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वरचष्मा असलेल्या देवळा तालुक्यातील ४९ गावांच्या तब्बल दीड लाख लोकसंख्येची सुरक्षा करण्यासाठी आजमितीला अवघे ३३ पोलीस अधिकारी व कर्मचारी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’नुसार कर्तव्य निभावत आहेत. विशेष म्हणजे ४७ पदे मंजूर असताना केवळ ३३ अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत. त्यातील १३ कर्मचाऱ्यांची बदली झालेली आहे. तर सटाणा येथील पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार सध्या कारभार पाहत आहेत.
या पार्श्वभूमीवर तीन बाजार समित्या, त्यात नेहमी चर्चेत असलेल्या उमराणे बाजार समितीसह राष्ट्रीय महामार्ग आहे. यामुळे तालुक्यात दररोज घडामोडी घडत असतात. अशावेळी तालुक्याला खमक्या व शिस्तप्रिय अधिकाऱ्याची गरज आहे. परंतु, प्रभारीराज व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्याने अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे, त्यातच नगरपंचायतची निवडणूक सुरू असल्याने पूर्णवेळ अधिकाऱ्याची गरज आहे. अशा परिस्थितीत जिल्हा पोलीस प्रमुख देवळा तालुक्यास खमका अधिकारी देणार का? याकडे संपूर्ण तालुकवासियांचे लक्ष लागून आहे.
देवळा तालुक्यासाठी लवकरात लवकर पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात येईल. सध्या प्रभारी अधिकारी देण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था सुरळीत आहे व राहील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
– सचिन पाटील, पोलीस अधीक्षक – नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम