नाशिक जिल्ह्यात चौदा खतविक्रेत्यांचे परवाने रद्द!

0
44

नाशिकः नाशिक जिल्ह्यात तब्बल 14 खतविक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून, तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा 10 लाखांचा साठा जप्त करण्याची कारवाई कृषी विभागाने केली आहे. त्यामुळे बोगस काम करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी अनेक विक्रेत्यांनी बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. यात सोयाबीन, कांद्याच्या बोगस बियाणांची विक्री करण्यात आली. अनेक ठिकाणी हे बियाणे उगवले नाही. सोबतच अनेकांनी बनावट खते आणि कीटकनाशकांची विक्री करून शेतकऱ्यांना गंडा घातला. त्यामुळे यंदा अशा व्यापाऱ्यांवर जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे. त्यात ज्या कंपनीकडे खते, बियाणे, कीटकनाशके तयार करण्याचा आणि विक्रीचा परवाना आहे, अशाच कंपनीचा माल विक्रेत्यांनी दुकानात ठेवावा, असे आवाहन केले आहे. असा माल न ठेवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यात येत आहे.

अनियमितता आढळली..

जिल्ह्यातील अनेक विक्रेत्यांनी योग्य कंपन्यांचा माल विक्रीसाठी ठेवला नव्हता. तसेच त्यांच्या व्यवहारातही कृषी विभागाच्या तपासणीत अनियमितता आढळली. त्यामुळे एकूण 14 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. विनापरवाना कीटकनाशकांची विक्री केली म्हणून ओझर, इंदिरानगर, पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तीन विक्रेत्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या विक्रेत्यांचा दहा लाखांपेक्षा जास्त रकमेचा माल जप्त करण्यात आला आहे. एका ठिकाणाहून पावणेचार लाख, तर दुसऱ्या ठिकाणावरून तब्बल आठ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पक्के बिले घ्यावीत..

बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करताना दुकानदारांनी पक्के बिले द्यावेत. जो विक्रेता पक्के बिल देणार नाही त्यांच्याबाबत तक्रारी आल्यास त्वरित कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनीही पक्के बिले मिळतील, अशाच ठिकाणी खते, बियाणे, कीटकनाशकांची खरेदी करावी. यामुळे फसवणूक टळले, असे आवाहन जिल्हा गणनियंत्रण अधिकारी आणि कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here