नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दिला आहे.
आपल्या भाषणाच्या खास शैलीमुळे इंदुरीकर महाराज संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते तसेच त्यांच्या कीर्तनाला श्रोत्यांची गर्दी देखील मोठी असते ते आपल्या ग्रामीण बोली भाषेमध्ये श्रोत्यांशी साधत असलेल्या संवादामुळे त्यांच्या या खास शैलीच नेहमीच कौतुक केलं जातं. मात्र काही वर्षांपूर्वी एका प्रवचनाच्या वेळी त्यांनी मुलगा व मुलगी यांच्या जन्माविषयी एक विधान केलं होतं यात सम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगी होते असं विधान त्यांनी केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ राज्यभरात व्हायरल झाला होता.
दरम्यान हे वक्तव्य अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोप करत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा शल्यचिकित्सकांनी पोलिसात तक्रार दाखल केली यामुळे हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात पोहोचलं होतं. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी त्यावेळी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र या विरोधात इंदोरीकरांनी सत्र न्यायालयात धाव घेतल्याने हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये सुरू होतं. यावर आज निकाल देत न्यायालयाने इंदुरीकर यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीने नोटीस बजावून खुलासा मागवल्याने इंदुरीकर यांनी नाराजी व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील नाराजीचा सूर उमटल्याचे चित्र बघायला मिळत होत. इंदुरीकर यांच्या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी ‘आमचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा आहे’ असे फलक झळकावत एक मोहीम हाती घेतली होती. तर इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी आंदोलन, मोर्चे काढण्याची तयारी सुद्धा दाखविण्यात आली होती. मात्र त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेता इंदुरीकर महाराजांनी असे कोणतेही कृत्य न करण्याची सूचना आपल्या श्रोत्यांना केली होती. दरम्यान जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर या प्रकरणी न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढलं असून यामुळे इंदुरीकर महाराजांना आपलं वक्तव्य चांगलंच महागात पडल्याचं बोललं जातं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम