–विशाखा देशमुख, जळगाव
काल दुपारी अडीच वाजताची वेळ होती. ओथंबलेल्या आभाळातून आषाढातला पाऊस कोसळून गेला होता. हे बाहेरून कामे करून घरी आले आणि सहज तीन-चार मित्र भेटल्याने बऱ्याच बातम्या कळल्या. त्यात जळगाव येथील एका भरवस्तीत असलेल्या मार्केटमध्ये, एका तृतीयपंथाचे निधन झाल्याची पण बातमी होती.
त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीबद्दल ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या. गेलेली व्यक्ती ही त्यांच्यातली नावाजलेली व्यक्ती होती. आणि तिथे गर्दीपण खूप होती. अजून दोन-तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या. खरंतर अशा लोकांबद्दल एक गोष्ट ऐकली होती की, अशा व्यक्तींपैकी कुणाचाही अंत झाला की त्याची कुठेही वाच्यता होत नाही. पण काल मात्र ही बातमी वार्यासारखी पूर्ण गावात पोहोचली. आणि आज चक्क वर्तमानपत्रात ती बातमी झळकली.
पुन्हा मनात विचार आला आज-काल अनेक गोष्टी अशा घडत आहे. त्यामुळे रूढी-परंपरा मोडल्या जात आहेत, हे नक्कीच समाजसुधारणेचे एक पाऊल म्हणावे लागेल. कारण या लोकांबद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना असते. त्यांना पाहिले की घाबरायला होते. अर्थात ज्या वस्तीमध्ये ते राहात असतात तेथील आजूबाजूच्या लोकांना त्याबद्दल फारसे काही वाटत नाही किंबहुना ते त्यांच्याशी सामान्य माणसाप्रमाणेच वागतात.
आपल्यासारख्यांना मात्र त्यांना पाहिले की वेगळेच वाटते. हे मार्केट शहराच्या अगदी मध्यावर असल्याने माणसांचा सतत राबता असतो. मीपण अनेकदा त्या मार्केटमध्ये जात असते. पुष्कळ वेळा भाजी घेताना किंवा मोबाईलचे काम करताना ते कधी आपल्याजवळ येतात. तर कधी दुकानाच्या समोरून जात असतात. कारण त्याच मार्केटमध्ये ते वरती रहातात हे माहीत होते.
तेथील भाजीवाल्यांना सुटे पैसे देताना आणि काही वस्तू खरेदी करताना मी काय सगळेच बघत असतात. त्यामुळे आता या वयात आपण निश्चितच त्यांना घाबरत नाही.
असे तृतीय पंथ भेटतात ते हमखास रेल्वेच्या प्रवासात आणि आता तर एखादं रेल्वेचे बंद गेट, टोल नाके, सिग्नल असेल अशा ठिकाणी तर असतातच. मग सोबत लहान मुले ,असली तर त्यांना सांगावे लागते; ते काही नाही करत. त्यातही महिलांना तर नाहीच नाही काही करत. लोकांनी त्यांना पैसे दिले की, ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा पण होतो. या गोष्टीवर तर सगळ्यांचे एकमत आहेच. खूप ठिकाणी त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात.
मध्यंतरी एका मैत्रिणीने तिच्याबाबतीत सांगितलेला किस्सा. तिच्याकडे जाळीचा दरवाजा लावलेला होता. घरात छोटे बाळ समोर खेळत होते. समोर कोणीच नव्हते. त्यांनी दार वाजवले. पाहिले तर दोन व्यक्ती दारात. खरंतर ती खूप घाबरली होती. पण अशावेळी धीराने तिने पटकन पैसे आणून दिले आणि त्यांनी बाळाला आशीर्वाद देऊन काढता पाय घेतला. गेल्या दोन वर्षात धुळे येथे लग्नाला जायचे प्रसंग आले. तिथे लग्नानंतरचे सप्तपदी, होम सुरू असताना अचानक तृतीयपंथीयांचे झालेले आगमन आणि त्यावेळी तिथे उपस्थित सगळ्यांचे चेहरे, एकदम बदललेले दिसले. सगळे वातावरण क्षणात डोळ्यासमोर येते.
त्या ठिकाणी पैशांवरून थोडी वादावादी पण झाली होती. मग तो वाद मिटवण्यात आला आणि ते निघून गेले आणि ते नववधूला पुढील वर्षी दोघांचे तीन होणार बघा असा आशिर्वाद देऊन गेले आणि सगळ्यांना हायस वाटलं. जाताना मात्र ते मला सांगून गेले. अहो ताई, हे लोक लग्नात एवढा खर्च करतात मग थोडे पैसे आम्हाला द्यायला काय झाले. अशा पैशाने तर आमचं पोट भरता ना. आम्ही पण माणसाचं आहोत..
हे सगळ आठवलं वरिष्ठ तृतीयपंथी राणी सविता जान उर्फ जगन मामा यांच्या जाण्याने….
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम