द पॉईंट नाऊ: सणासुदीच्या कालावधीत अन्न पदार्थांमध्ये जास्त भेसळ होण्याचा संभाव असतो. यासाठी नागरिकांनी उपवासाचे पदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या बाबत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात विविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. या काळात मालाचा मोठ्या प्रमाणात उठाव असतो. त्यामुळे पदार्थांमध्ये भेसळ होण्याचा संभव असतो. या काळात शक्यतो भगर, शेंगदाणे, खाद्यतेल, साबुदाणा, राजगिरा पीठ, भगरीचे पीठ याचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. या कालावधीतच मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याचा संभव असतो.
नवरात्रीच्या दरम्यान भगर ही जास्त प्रमाणात खाल्ली जाते. भगरीमध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण खूप कमी असते. त्यात आयर्न फॅट आणि प्रोटीन हे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळेच ती आरोग्यास पोषक मानली जाते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत फराळ म्हणून उपवासासाठी भगरीच्या सेवनाला प्राधान्य दिले आहे. भगरीच्या पिठात काही रासायनिक प्रक्रिया केलेल्या गोष्टी मिसळल्या जातात. यातून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. बाजारातून भगरीचे पीठ घेताना नागरिकांना लक्षात येत नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने याचा छडा लावण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे नागरिकांनी भगर घेताना ती पॅक घ्यावी. सुटी भगर घेऊ नये. यादरम्यान साबुदाणाही भेसळयुक्त येऊ शकतो.
भेसळयुक्त साबुदाण्यामध्ये ब्लीचिंगएजंट्स आणि रसायने असतात, जी पांढरे आणि चमकदार असतात. ते खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. यासाठी साबुदाणा घेतानाही पाहून घ्यावा. राजगिरा पीठ, भगरीचे पीठ, साबुदाणा पीठ, शिंगाडा पीठ आदी शक्यतो घरी करावीत. आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. तेल, तूपदेखील नेहमीच्या दुकानातून घ्यावे. शक्यतो सुट्या वस्तू घेण्याचे टाळावे, असेही त्यात म्हटले आहे.
नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात उपवासाच्या पदार्थांची विक्री होत असते. घाईत नागरिक उत्पादनांच्या तारखांकडे लक्ष देत नाहीत. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या मानकांप्रमाणे पदार्थ आहेत की नाही याची खात्री करीत नाहीत. वेळ लागला तर चालेल, परंतु सर्व वस्तू पारखून, स्वच्छ असल्याची करून घ्यावी. अशी माहिती नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त, गणेश परळीकर यांनी दिली.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त यांनी कशी काळजी घ्यावी याबद्दलही माहिती दिली.
परवानाधारक विक्रेत्यांकडून मालाची खरेदी करावी.
पॅकबंद उपवासाचे पदार्थ खरेदी करावेत.
उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर तपासून घ्यावे.
भगरीचे उत्पादन कधी झाले ते आणि कधीपर्यंत वापरायचे हे पाहून घ्यावे.
घरगुती पीठ तयार करावे.
विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे.
सकाळी तयार केलेली भगर संध्याकाळी सेवन करू नये.
उपवासाचे पदार्थ स्वच्छ वातावरणात व शुद्ध पाण्याततयार करावेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम