आशिया कपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव; लंकेचा कर्णधाराची विजयी खेळी

0
30

दुबई – आशिया कप २०२२च्या सुपर ४ फेरीत श्रीलंकाने भारतावर ६ गडी राखत रोमांचक विजय मिळवला. यासह श्रीलंका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असून भारताला स्पर्धेत सलग दुसरा पराभव पत्करावा लागला आहे.

अखेरच्या काही षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेत श्रीलंकाने अखेरच्या षटकातील एक चेंडू राखून विजय मिळवला. यावेळी लंकेचा कर्णधार दासून शनाकाने १८ चेंडूत ३३ धावांची संकटमोचक अशी नाबाद खेळी केली.

श्रीलंकाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. डावाची सुरुवात करताना केएल राहुल(६) आणि विराट कोहली(०) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सुर्यकुमार यादवसह भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने ४१ चेंडूत ४ षटकारांसह ७१ धावांची तुफानी खेळी केली, तर सुर्यकुमारने २९ चेंडूत ३४ धावा केल्या. मात्र रोहित बाद होताच भारताचा डाव गडगडला. शेवटी आर. अश्विनने १५ धावा करत संघाचा डाव २० षटकात ८ बाद १७३ वर पोहोचवला.

१७४ धावांचे लक्ष्य गाठताना लंकेने शानदार सुरुवात केली. सलामी फलंदाज कुशल मेंडीस(५७) व पथम निशंकाने(५२) अर्धशतकी खेळी केली. ऐन मोक्याच्यावेळी युझवेंद्र चहलने सलामी फलंदाजांसह ३ बळी मिळवत सामना भारताच्या बाजूने नेला खरा. पण कर्णधार दासून शनाकाने भानुका राजपक्षसह नाबाद खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. कर्णधार शनाकाच्या अष्टपैलू खेळीसाठी (फलंदाजीत ३३ धावा, गोलंदाजीत २६ धावा २ बळी) त्याला सामनावीराने गौरवण्यात आले.

या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे जरी दिसत असली, तरी आता भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here