देवळा : पोलिस म्हटले की जनतेला धाक वाटतो भीती वाटते मात्र पोलिसांच्या हृदयातील माणुसकी मात्र नागरिकांना फारच क्वचित प्रसंगी बघायला मिळते. पोलिसांच्या संवेनशीलतेचे असेच दर्शन देवळा येथील नागरिकांना अनुभवायला मिळाले त्याचे निम्मित होते देवळा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यातील कृतिशील संवेदनशीलतेमुळे वाट चुकलेल्या तरुण महिलेला सुखरूप तिच्या कुटुंबात रवाना केल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले. खरे तर कुणाची तक्रार नसतानाही पोलिसांनी सतर्कतेने यात लक्ष घातल्याने ही महिला सुखरूप घरी पोहोचती झाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या तीन -चार दिवसांपूर्वी (दि.२२) देवळा नगरपंचायतीजवळ असलेल्या चहा-नाष्टाच्या दुकानात एक महिला चहा मागत असल्याचे आणि ती थोडीशी मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याचे लक्षात आल्याने तेथील गोकुळ देवरे यांनी तसे पोलिसांना कळवले. पंजाबी ड्रेस, व्यवस्थित बोलणे या वर्णनामुळे ही महिला निश्चित वाट चुकलेली आणि चांगल्या घरची असल्याने तिचा तपास करायला हवा अशा सूचना येथील पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी तातडीने पोलिसांना दिल्या. मात्र या दरम्यानच्या कालावधीत ती परिसरात न दिसल्याने शंकेची पाल चुकचुकायला लागली. परंतु पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याने ती शहराच्या एका बाजूस मिळून आली. श्री.लांडगे यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता ती नामपूर येथील इंदिरानगर भागातील असल्याचे तिने सांगितले. यावर जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्याशी संपर्क साधून याबाबत तपास करण्यास सांगितले असता घरगुती वादातून एक महिला बेपत्ता झाल्याचे कळाले.
देवळा परिसरात मिळून आलेली सदर महिला पुन्हा बाहेर कुठे निघून जाऊ नये म्हणून तिला पोलीस ठाण्यात चहा-जेवण देत सुरक्षित ठेवले. सदर कुटुंबातील सदस्यांना याबाबत कळवताच त्यांनी देवळा पोलीस स्टेशनमध्ये येत पोलिसांचे आभार मानत तिला घरी नेले. अत्यंत धावपळीच्या कामातही पोलिसांनी गांभीर्याने या महिलेची दखल घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलीस हवालदार रामदास गवळी, महिला पोलीस नाईक ज्योती गोसावी, छाया गांगुर्डे आदींनी आपले कर्तव्य निभावले.
“समाजात वावरताना अशा काही घटना, प्रसंग वा काही अवैध प्रकार नजरेस पडल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना कळवल्यास पुढील अनर्थ टाळता आला. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने याबाबत सक्रिय राहण्याची गरज आहे.”
– दिलीप लांडगे, पोलीस निरीक्षक देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम