नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला; 13 जून रोजी आरक्षण सोडत

0
25

द पॉईंट नाऊ ब्युरो : नगर परिषद निवडणुकांची सारे मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यात लवकरच 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीची आरक्षण सोडत येत्या 13 जूनला काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केल्याने, राजकीय वर्गात मोठा हिरमोड झाला. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या. मात्र आता लवकरच निवडणुका होणार आहेत. राज्यात होणाऱ्या 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आता सर्वांना खुणावत आहेत. त्याचीच सोडत येत्या 13 जून रोजी काढण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 15 ते 21 जून दरम्यान हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या घोषनेनुसार या आरक्षण सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मधील 208 नगरपरिषद आहेत, तर 8 नगरपंचायत आहेत. आरक्षणाची अंतिम अधिसूचना ही 1 जुलै रोजी काढण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीबाबत निवडणूक आयोगाच्या या अधिसूचनेनंतर आता राजकीय पक्षांची लगबग सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुढे काय चित्र दिसते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकांमध्ये सर्वांना समान संधी मिळण्याच्या उद्देशाने आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारास निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळू लागली. या कारणाने आज निवडणुकांमध्ये आरक्षणाला खूप महत्व आहे.

आरक्षण सोडतीवरच राजकीय नेतेमंडळींचे भवितव्य अवलंबून असते. आरक्षण निघाल्यानंतर कोणता प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी, कोणता प्रभाग आरक्षित आहे, अनुसूचित जाती – अनुसूचित जमातीसाठी कोणता प्रभाग या साऱ्या गोष्टींकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागून राहते. कारण त्यानुसारच त्यांच्या पुढील रणनीती ठरवल्या जातात. त्यात आरक्षण सोडत नुसार उमेदवार कोण असेल, कोण योग्य ठरेल, कोण जनतेच्या मनात आहे अशा अनेक गोष्टींचा विचार करून राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडत असतात. कारण त्यावरच त्यांच्या पक्षाचे देखील भवितव्य अवलंबून असते. पक्षाची सत्ता येण्याच्या दृष्टीने, प्रत्येक उमेदवार हा निवडूनच यावा या उद्देशाने राजकीय पक्षांद्वारे मोट बांधली जाते.

आता येत्या 13 जूनला आरक्षण सोडत निघाल्यानंतर राजकीय पक्ष खऱ्या अर्थाने कामाला लागतील. त्यांची लगबग सुरू होईल. त्यानंतरच कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण असेल हे निश्चित होईल. त्यामुळे काहींना लॉटरी लागेल, तर काहींचा पुरता हिरमोड देखील होईल. मात्र शेवटचा निर्णय हा मतदार राजाचाच असेल हे नक्की.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here