देश हादरला! अल्पवयीन मुलींसह एका ब्रिटिश महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्काराच्या घटना

0
21

द पॉईंट नाऊ ब्युरो : देशाला हादरवणारी आणि देशाच्या नावाला ठेच पोहोचवणारी घटना तेलंगणा आणि गोव्यात घडली आहे. तेलंगणा मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना घडल्यानंतर आता पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आले आहे आणि गोव्यात एका ब्रिटिश महिलेवर बलात्कार प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

भारत देशाच्या संस्कृतीला परदेशात मोठा बहुमान आहे. भारताची संस्कृती जाणण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी पाश्चात्य देशातील नागरिक आपल्या देशात येतात. मात्र काही नराधमांच्या दुष्कृत्यांमुळे देशाच्या नावाला काळिमा पोहोचतो. गोवा राज्याच्या आरंबोल समुद्र किनाऱ्यावर एका ब्रिटिश महिलेवर तिच्या पतीच्या डोळ्यांदेखत अत्याचार करण्यात आला.

दुसरीकडे तेलंगणा राज्याच्या हैदराबाद येथे दोन अल्पवयीन मुलींवर काही नराधमांनी बलात्कार केला होता. यापैकी रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात एक आणि राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर थिएटरमध्ये बलात्कार करण्यात आला. तर एका अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. आता हैदराबाद मध्ये अजून एका अल्पवयीन मुलीवर  अत्याचाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सुफीयान यास अटक केली आहे. या घटनांनी देशाला पूर्णतः हादरवून सोडले आहे.

गोव्यात आरंबोल समुद्र किनाऱ्यावर स्थानिक रहिवासी 32 वर्षीय जोएल डिसुझा याने मसाज देण्याच्या बहाण्याने ब्रिटिश महिलेवर बलात्कार केला. ही घटना 2 जून रोजी घडली होती. त्यानंतर कुटुंबीय आणि भारतातील ब्रिटिश दुतावासाशी चर्चा केल्यानंतर या पीडित ब्रिटिश महिलेने पेरणेम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यातील आरोपी जोएल डिसुझाला पोलिसांनी 6 जून रोजी अटक केली आहे.

गोव्यात परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनास येत असतात. इथले सौंदर्य परदेशी पर्यटकांना मोहित करते. याच कारणाने येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. याआधी देखील गोव्यात परदेशी पर्यटकांवर बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. 2008 मध्ये एका 15 वर्षीय परदेशी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये एका ब्रिटिश महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. या घटनांमुळे अशा नराधमांच्या कारणाने देशाची प्रतिमा नाहक मलिन होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

भारतात बलात्काराच्या वाढत्या घटनांनी चिंता वाढवली आहे. त्यात नराधमांच्या वासनेला काही एक सीमा राहिलेली नाही. त्यामुळे मुली सुरक्षित आहेत तरी कुठे, असा सवाल पालकांना पडू लागला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here