शाळेच्या पहिल्याच दिवशी कुठे विद्यार्थ्यांचं बैलगाडीतून स्वागत करण्यात आलं तर कुठे त्यांना औक्षण करून वर्गात बसवण्यात आलं, काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेत त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तर काही ठिकाणी वाजत गाजत त्यांना वर्गापर्यंत पोहोचवण्यात आलं. मात्र एका जिल्हा परिषदेच्या एका शाळेत विद्यार्थिनींना आमरस पुरणपोळीच शाही जेवण देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.
कळवण तालुक्यातील आभोणा या ठिकाणी असलेल्या मुलींच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं आमरस पुरणपोळीचे जेवण देऊन स्वागत करण्यात आले आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश दुसाने यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस गोड व्हावा आणि सर्वांच्या लक्षात राहावा हा हेतू मनात ठेवत हा घाट घातला होता.
शाळेचा पहिला दिवस तसा विद्यार्थ्यांसाठी काहीसा अवघडच असतो. नवीन शिक्षक, नवीन वर्ग, नवीन बँच, नवीन मित्र-मैत्रिणी या सगळ्यांमध्ये त्यांना शिक्षणाची भीती वाटू नये आणि त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून नवनवीन उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. यातच आता शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं विविध पद्धतीने स्वागत करण्याचा नवीन ट्रेंड सध्या बघायला मिळत आहे. यामुळे विद्यार्थी देखील आपल्या मनातली भीती विसरून शाळेचा पहिला दिवस खूप आनंदाने घालवत असतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं अंतर भरून काढण्यासाठी या गोष्टींचा मोठा फायदा होत असल्याचा देखील निदर्शनास येत आहे. असंच शिक्षक आणि विद्यार्थ्यां मधील अंतर कमी व्हावं, त्यांच्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण व्हावं आणि त्यांच्यात अभ्यासाची भीती येऊ नये म्हणून अभोणा येथील जिल्हा परिषद शाळेचे व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष राकेश दुसाने यांनी विद्यार्थिनींच अनोख्या पद्धतीने केलेले हे स्वागत पाहून पालकही भारावून गेले होते.
दरम्यान यावेळी विद्यार्थिनींनी रॅली काढून शाळेची उपस्थिती दाखवली गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव यांनी सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती बघून त्यांचे कौतुक व सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक राऊत, मुख्याध्यापिका श्रीमती जगताप, अभोना पोलीस स्टेशनचे एपीआय नितीन शिंदे, सर्व शिक्षक वृंद, सरपंच, उपसरपंच, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम