रोहित गुरव
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (ताहाराबाद) : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रुप ग्रामपंचायतीत एक ना अनेक गैर व्यवहार बाहेर येतच आहेत.
आता ताहाराबाद येथे पदाचा दुरूपयोग करत ग्रामविकास अधिकारी व तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सन २०१९-२० मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सुमारे ६० ते ७० लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी (रामदास आठवले) गटाचे कैलास मोरे, शिवसेनेचे सुभाष नंदन यांनी केला आहे.
शिवसेनेचे सुभाष नंदन यांनी मागील बऱ्याच काळापासून ताहाराबाद येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या गैर व्यवहारांवर सदैव आवाज उठवला आहे.आता अजून नवीन प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत ताहाराबाद अंतर्गत सन २०१९-२० मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या विकासाठी गावातील आंबेडकर नगर भूमिगत गटार साठी २० लाख, संत रोहिदास नगर भूमिगत गटारीसाठी ८ लाख, जुना राजवाडा फेवर ब्लॉक बसविणे १२ लाख, आण्णा भाऊ साठे नगर फेवर ब्लॉक बसविणे ८ लाख, संत रोहिदास नगर भूमिगत गटारीसाठी ४ लाख तसेच चौदावा वित्त आयोग अंतर्गत १० लाख रुपये समाज मंदिरासाठी आरक्षित असताना सदर निधी दुसरी कडे खर्च केला अशी सर्रासपणे उडवाउडवीची उत्तरे ग्रामविकास अधिकारी देत आहेत. पण त्या संबधीत माहिती मागितली, तर ती देखील मिळत नाही.
असे एक ना अनेक गैर व्यवहाराचे प्रकार ताहाराबाद येथील ग्रुप ग्रामपंचायतीत दिसून येत आहेत. त्यामुळे ही ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी की, गैर व्यवहारांसाठी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
याबाबत वेळोवेळी कैलास मोरे व सुभाष नंदन यांनी आंदोलन करून देखील अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. या सर्व कामासाठी एकूण ६० ते ७० लाख निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला असून, सदर कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आहेत.
ताहाराबाद मधील आंबेडकर नगर, भूमिगत गटार, संत रोहिदास नगर भूमिगत गटारी हि कामे इस्टिमेट प्रमाणे झाली नाही आहेत. आंबेडकर नगरमध्ये २० लाखाच्या भूमिगत गटारीच्या कामांपैकी फक्त ३०० मीटर काम करून उर्वरित काम हे जनरल वस्ती न्यू प्लॉट मध्ये केले. तसेच संत रोहिदास नगर मधील भूमीगत गटारीचे ८ लाखाच्या कामांपैकी ९० मीटर काम हे दलित वस्तीत, उर्वरित काम न्यू प्लॉट मध्ये करण्यात आले. तसेच जुना राजवाडा फेवर ब्लॉक बसविणे १२ लाख,आण्णा भाऊ साठे नगर फेवर ब्लॉक बसविणे ८ लाख ही कामे देखील अंदाजपत्रकानुसार झालेली नाही.
ग्रामविकास अधिकारी, तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी, ठेकेदार यांनी निधीचा गैरवापर करून दलित समाजावर अन्याय केला आहे. वरील सर्व कामे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचा विकास या योजने अंतर्गत असताना ती परस्पर जनरल वस्तीत वर्ग करून दलित समाजाला वंचित ठेऊन निधीचा गैरवापर करणाऱ्यावर जिल्हा परिषद मुख्य अधिकारी लीना बनसोड यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने निष्पक्ष चौकशी करून दलित जनतेला न्याय मिळवून द्यावा व संबंधीत ग्रामविकास अधिकारी, ठेकेदार, तत्कालीन पदाधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ताहाराबाद ग्रामस्थ करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम