सोमवारी कामावर परत या आणि निलंबन कारवाई मागे घ्या

0
36

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : एस. टी. महामंडळाच्या आंदोलन करणाऱ्या निलंबित कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने सोमवार पर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. सोमवार पर्यंत जे कर्मचारी कामावर परततील, त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेले एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजून थांबलेले नाही. त्यामुळे आत्ता पर्यंत जवळपास दहा हजाराहून अधिक एस. टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. तर मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे.

आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांना सोमवार पर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. सोमवार पर्यंत कामावर न परतल्यास, कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यापासून बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सुमारे 105 बस डेपो पुन्हा सुरू झाल्याचे व एकोणीस हजार कर्मचारी कामावर परतल्याचे एस. टी. महामंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.

बरेचसे एस. टी. कर्मचारी कामावर परतल्याने बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या होत्या. मात्र अनेक बसेसवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सरकारने अधिक गंभीर होत आंदोलकांना सज्जड दम भरला होता. कामावर परत येऊ पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणी रोखत असेल, तर अशांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता.

आत्तापर्यंत दहा हजार कर्मचारी निलंबित झाले आहेत. मात्र आता हे कर्मचारी सोमवार पर्यंत कामावर परतले, तर त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आता तरी आंदोलक काय निर्णय घेतात, याकडे प्रवासी वर्गाचे देखील लक्ष लागून राहिले आहे.

एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू करून अनेक प्रकारच्या मागण्या केल्या. त्यातील त्यांचे वेतन वाढ आणि वेतन वेळेवर मिळण्याची मागणी पूर्ण झाली. मात्र आंदोलक एस. टी. कर्मचारी महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. त्यामुळे अद्याप त्यांचे आंदोलन थांबण्यास तयार नाही. मात्र यामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

105 डेपोमध्ये बस सुरू झाल्याचे जरी एस. टी. महामंडळ प्रशासनाने म्हटले असले, तरी अद्याप देखील सेवा पूर्ववत झाल्याचे दिसत नाही आहे. त्यामुळे आता शासनाच्या या आवाहणानंतर आंदोलक एस. टी. कर्मचारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here