वैभव पगार,
म्हेळुस्के प्रतिनिधी : अध्यात्मिक वाटेवरून लोकांना सेवाव्रती करण्याचे व्रत आपल्या कर्मयोगातून शिकविणा-या परमहंस परमपूज्य शिवदासगिरी महाराज (बाबाजी) यांच्या षोडशी कार्यक्रमानिमित्ताने श्री क्षेत्रकरंजी भक्तिमय झाले आहे. उद्या रविवार, ( १३ फेब्रुवारी ) रोजी सकाळी ११ वाजता श्री संत-महंत तसेच ब्राम्हणवृंदाच्या उपस्थितीत व मंत्रोच्चारात हा कार्यक्रम होणार असून, शनिवारी १२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत नागपूर येथील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे श्री हरि संकिर्तन होणार आहे.
येथे ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत येथे सुश्री मनिषादीदी ( सिध्दरूढ आश्रम,, निवाणे, ता. काळवण) यांच्या अमृतवाणीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू होता. ब्रम्हलिन परमहंस शिवदासगिरीजी महाराज उर्फ सुभाषगिरीजी महाराज हे वयाच्या आठव्या वर्षी कर्दमाश्रमात प्रकट झाले अन् एक नवे युग या परिसरात अवतरल्याचे ग्रामस्थ मानतात. तब्बल ४२ वर्षे बाबाजींनी मौनव्रत धारण केलेले होते. मात्र त्याहीवेळेस त्यांनी गावक-यांना दुर्गम क्षेत्राचा कायापालट करून दाखविला. गो-सेवा करतांनाच त्यांनी शेतीविषयक कामेही करून दाखविली. केवळ अध्यात्मच नव्हे तर जोडीला कुस्ती, मल्लविद्या, घोडेस्वारी यांचीही आवड जोपासत लोकांना धार्मिक वळण लावले.
१९७२ साली आलेल्या दुष्काळात अन्नधान्याची टंचाई असतांना स्वतः विहिर खोदून, गरजूंना स्वतः स्वयंपाक बनवून देत माणुसकीचा आदर्श घालून दिला. गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण व लग्नकार्यात मदत ते नेहमीच करीत आलेले असल्याने स्वाभाविकच त्यांचा भक्त परिवार हा वाढता राहिलेला आहे. बाबाजींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी व संस्कृत इत्यादी भाषांवर प्रभूत्व आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, चालू घडामोडी यांचे चांगले ज्ञान त्यांना आहे. देवस्थानाच्या गु-हाळात केमिकल विरहित गुळ देखील तयार केला जातो, आणि असे अनेक प्रयोग बाबाजी करीत असतात. आजुबाजूच्या बहुतेक सर्वच मंदिरांचा बाबाजींनी जीर्णोध्दार करून, परिसराला एक नवीन ओळख करून दिलेली आहे. भक्तनिवासाच्या इमारती, भव्य गो-शाळा भाकड गाई संगोपन ही त्यापैकीच आणखी प्रशंसनीय कामे होत. मात्र गोरगरीबांसाठी चांगले हॉस्पिटल असावे ही त्यांची इच्छा अजून अपूर्णच राहिलेली आहे.
दिंडोरी, पेठ, सुरगाणा, व कळवण या आदिवासी भागातील गोरगरीबांच्या निरक्षरतेमुळेच अंधश्रध्दा व व्यसनाधिनता वाढते आहे, हे लक्षात घेऊन बाबाजींनी या भागातील विद्यार्थ्यांसाठी सन २००३ साली श्री गुरूदत्त शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केलेली असून, ऋषिलॅन्ड नामक या शाळांमधून पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत १२०० विद्यार्थी घेत आहेत. अगदी स्कूल बसेसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन समस्थ भक्तगण व जनसामान्यांना श्री क्षेत्र गुरूदेव दत्त देवस्थान करंजी ट्रस्टतर्फे करण्यात आलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम