भ्रष्टाचाराने बरबटलेले राजकारणी हात; पण एकतर्फी तपासातच गुंतलेल्या दिसताय तपास यंत्रणा..

0
31

द पॉईंट नाऊ विशेष : 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हे आज केवळ आणि केवळ बोलण्यापूरतं झालं आहे. असच म्हणावं लागेल. कारण आज 80 टक्के राजकारण (तेही पोळी भाजून घेणारं) आणि समाजकारण (तेही दाखवण्यापुरतं असच दिसून येत आहे.

महाराष्ट्राने या देशाला आजवर अनेक महत्वपूर्ण नेते दिले. मात्र आज ती परिस्थिती नाही. असच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मागील काही दिवसांत लोक राजकारण्यांना भ्रष्टाचारी का बरं म्हणत असतील? का एवढं राजकारणाच्या नावाने नाक मुरडत असतील? याचा प्रत्यय येतो आहे.

सध्या महाराष्ट्रात सत्तेत असणारे महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या पाठीमागे लागलेली तपास यंत्रणांची साडेसाती, सगळं काही काळं-बेरं बाहेर काढतांना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मातब्बर म्हणून नावाजलेले अनेक मोठमोठे या राजकीय समुद्रातील मासे तपास यंत्रणांच्या गळाला लागले आहेत. आणि कोठडीमध्ये आहेत. मात्र हे सारं घडू लागलं ते, भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यावर. म्हणून प्रश्न पडू लागलाय की, तपास यंत्रणा आजवर झोपल्या होत्या का? की बाकी मंडळींच्या भाजलेल्या पोळ्यांमध्ये आपलाही वाटा घेत होत्या? की मग दबावाखाली होत्या? असे एक ना अनेक प्रश्न पडत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना अशा प्रत्येक पक्षातील कोणाचे ना कोणाचे लागेबांधे आता अचानकच समोर येत आहेत. मग आजवर हे सगळं का घडलं नाही? की सारे झोपले होते? असे प्रश्न पडू लागले आहेत.

अचानकपणे अनेक मंत्री-संत्री मोठमोठे घबाड गोळा करण्याच्या किंवा इतर कुठल्या कारणाने तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. आलिशान महिलांमध्ये राहणारे मंत्री-संत्री लोखंडी सळयांच्या आड कोंडले गेले आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांचे वेगळेच वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील राजकारण सडत चाललंय का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कुणी पावसात भिजलं, कुणी पहाटे शपथ घेतली, कुणी पुन्हा परत येईन म्हणून आणा-भाका घेतल्या. पण अखेर ‘सत्ता मज प्रिय, तुजहुन सख्या’ असं म्हणत वेगळे संसार थाटले गेले. सगळ्या तत्वांना तिलांजली वाहिली गेली.

राजकारण सडतय म्हणण्यास कारण हेच की, कधीतरी आपल्या कामामुळे जनतेच्या मनात जागा निर्माण करणारे अचानकपणे भलत्याच जंजाळात अडकल्याचे दिसुन येत आहे.

आजवर शांत असणारं वातावरण सत्तापालट झाला आणि लगेचच खवळून निघणारा समुद्र जसा त्याच्या अंतरंगात अडकलेली घाण बाहेर टाकतो, तसे सारं काही बाहेर यायला सुरुवात झाली. चक्क, तपास यंत्रणांबाबत काही राजकारणी मंडळींच्या मनात तर भीतीच भरली गेली. यामुळे हे सारं अचानक का? आजवर तपास यंत्रणा शांत का होत्या? अचानकपणे हे सारं कसं बाहेर येऊ लागलं? यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

त्यात तपास यंत्रणा एकतर्फी तपासात गुंतल्यात का? असे प्रश्न देखील पडताय. कारण आत्तापर्यंत ज्याही नेत्यांची चौकशी झाली, जे अटकेत आहेत, ज्यांच्या नातलगांची चौकशी झाली, ते सारे महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील आहेत. मग विरोधी पक्षातील मंडळी इतके धुतल्या तांदळाचे आहेत का? असतील तर सोन्याहून पिवळच म्हणावं. पण सोन्याहून पिवळं दुसरं काही नसतं, हेही तितकंच खरं.

तपास यंत्रणा या सर्वांसाठी समान काम करणाऱ्या असतात. त्यामुळे आत्ता ज्या प्रकारे तपास यंत्रणांद्वारे ससेमिरा सुरू आहे, तो निःपक्षपाती आहे ना? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. कोणत्याही बाबींचा तपास हा दोन्ही बाजूंचा विचार करूनच व्हायला हवा. आणि याचा विचार तपास यंत्रणांनी करणे आवश्यक आहे.

एकामागे एक घोटाळ्याच्या चिखलात अडकणारे नेते मंडळी, राजकारणाला काय म्हणावे? असा विचार करण्यास भाग पाडत आहेत. तर अचानकपणे जागे झालेल्या आणि एकाच घटकामागे लागलेल्या तपास यंत्रणा निःपक्षपातीपणाबाबत विचार करायला भाग पाडत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here