द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : यंदाच्या वर्षी ‘असनी’ चक्रीवादाळामुळे काही दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. अंदमानचा समुद्र पार करून सध्या बंगालच्या उपसागरात र्नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकत आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल होणार आहे. मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती तयार झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरामधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या देशातील पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांतील काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडत असून, महाराष्ट्रात देखील काही भागात पावसाची हजेरी आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. यंदा नियमित वेळेपेक्षा सुमारे सहा दिवस आधी म्हणजेच १६ मे रोजी मोसमी वारे सक्रिय होऊन अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला.
पुढील दोन ते तीन दिवसात कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, नगर, लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात २१ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे.
१७ मे रोजी मोसमी वाऱ्यांमध्ये कोणतीही प्रगती केली नाही. मात्र, १८ मे रोजी उत्तर-पूर्व दिशेत बंगालच्या उपसागरात प्रगती केली. दक्षिणेच्या बाजूने मात्र अजूनही प्रगती केलेली नाही. मात्र, पोषक वातावरण असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरासह दक्षिण अरबी समुद्रापर्यंत पोहचतील, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम