– काजल आहेर-शेलार
द पॉईंट नाऊ स्पेशल ; सिन्नरच्या एका शेकऱ्याचं पोरग ऋषीकेश शेलार जेव्हा ‘इंडियन आइडल’ मराठीच्या मंचावर टॉप 14 मध्ये पोहचतो तेव्हा तुम्हा आम्हा नाशिककरांच्या नजरा अभिमानाने भिरभिरता, मात्र हा ऋषी इथपर्यंत कसा पोहचला त्याचा संघर्ष काय हे वाचा सविस्तर…..
हायस्कूल च्या सांस्कृतिक कार्यक्रमात एक गण गायला आणि गाण्याची गोडी अंगात भिनली, दुधात साखर विरघळावी तशी. पुढे लासलगाव कॉलेजमध्ये ऋषी जूनियर पदवी उत्तीर्ण झाला. लासलगावला शिकायला जाताना इतर मुलांच्या घरातून जस शिक्षण आणि राहण्याची खाण्याची सोय घरचे करून देतात तस त्याच्या बाबतीत नव्हत. तो लासलगावला गेला खरा पण त्या अनोळखी शहरात राहणार कुठे खाणार काय याची मोठी पंचाईत होती. तेव्हा एक कवी मनाचे गृहस्थ त्याला भेटले. नाव राजाबाबा होळकर. त्यांच्या माळावर एक रिकामी खोली बघून त्याने तिथे राहता येईल का असे विचारले. त्यांनी त्याला कुठला, काय करतोस , आईवडील काय करतात सगळ विचारल. त्याने त्यांना नम्रपणे उत्तरे दिली आणि गाण शिकतो आहे असही त्याने सांगितल. राजाबाबाना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला माळावरच्या खोलीत रहायला परवानगी दिली.
ती जागा इतक्या निर्जीव ठिकाणी होती की एक किलोमीटर अंतरावर कुणाचंच घर दिसत नव्हत. माळाला लागूनच रेल्वे ट्रैक होता. ऋषी तिथे एकटाच राहत होता त्यामुळे तिथली भयानकता त्याला रात्री चांगलीच जाणवे . पण शिकायच होत मोठ व्हायच होत, आणि त्यासाठी सगळी धडपड चालू होती. पहाटे चार वाजता उठून तो रियाज करायचा नंतर सगळ आवरून 7 वाजता कॉलेज. कॉलेज मधून आल्यावर पुन्हा रियाज असा त्याचा त्यावेळचा दिनक्रम असायचा. माळावर काही दिवसानंतर एक नाईक आज्जी रहायला आली. ती ऋषीला खूप जीव लावायची. लासलगाव मध्ये ऋषी नेहमी एका दर्ग्यात जाई. तिथे एक फकिर राहत असे. त्याची कव्वाली, अजाण वगैरे ऐकून ऋषीला सगळा थकवा निघून गेल्यासारख वाटे. तो रोज त्या फकिरबाबाला भेटायला दर्ग्यात जाऊ लागला, त्याच्या सुफी रचना ऐकू लागला. आणि फकीर बाबाच्या मुखातून येणाऱ्या सुफी संताशी ऋषी एकरूप होऊ लागला. एकीकडे सीनियर कॉलेजच शिक्षण तर एकीकडे गाण शिकण्याची ओढ. ऋषींला गाण शांत बसू देत नव्हत. त्याने गाण शिकण्यासाठी धडपड सुरूच ठेवली. सकाळी कॉलेज करून नंतर तो तपोवन ने नाशिकला श्री. आनंद अत्रे यांच्याकडे गाण शिकायला जाई. घरी परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला गाण शिकण्यासाठी घरच्यांचा प्रचंड विरोध होता. आणि अशा परिस्थितीत पैशांची चणचण असल्यामुळे तो बिना तिकीट रेल्वेने प्रवास करून लासलगावहून नाशिकला जात, दैव त्यावेळी त्याच्या सोबत होत.
एक दिवस रेल्वेत प्रवास करत असताना टी. सी ने त्याला तिकीट विचारल. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तिकीट असण्याचा संबंधच नव्हता. टीसी ने त्याला धमकावल आणि सांगितल बिना तिकीट प्रवास करणाऱ्याला 6 महिने तुरुंगात जाव लागत. आणि तू बिना तिकीट प्रवास करतोयस. कुठला आहेस तू..? कुठे गेला होतास..? कशासाठी..? आईवडील काय करतात..? त्यांच हे सर्व विचारून झाल्यावर ऋषीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व गाण शिकतोय ,पण घरच्यांकडून गाण शिकण्यासाठी पैसे नाही मागु शकत. आणि मी अजून शिकतोय त्यामुळे माझ्याकडे पैसे नाहियेत. मला माफ करा. त्यावर टी.सी त्याला आपल्या compartment मध्ये घेऊन गेले आणि गायला सांगितलं. ऋषीने जेव्हढं येत होत तेव्हढं गाण ऐकवलं. गाण ऐकून टीसीने ऋषीला शाबासकी दिली आणि लासलगाव स्टेशन आल्यावर त्याला जायला सांगितलं. खरच कारागिराच्या हातून एकेक पैलू पडून ज्याप्रमाणे हिरा घडतो त्याचप्रमाणे परिस्थितीने दिलेल्या घावांनी रक्तबंबाळ होऊन कलावंत घडतो.
ऋषीला गाण्याची भूक होती. त्याने लासलगाव कॉलेजला पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केल आणि नाशिकला केवळ गाण शिकण्यासाठी यायच ठरवल. पण घरच्यांना तो गाण शिकत असल्याची भनक देखील नव्हती. नाशिकला आल्यावर त्याने राशिदखाँ साहेबांचे शिष्य श्री. प्रसाद खापरडे यांच्याकडे गाण्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. पण पुन्हा प्रश्न होताच रहायचं कुठे खायचं काय? कारण त्यावेळी घरच्यांकडून पैसे मागणं शक्य नव्हतं तरीही मनाचा हिय्या करून त्याने घरी पैशांची मागणी करण्याचा निर्णय घेतला. आणि गावी गेला. घरी आल्यानंतर दुसर्याच दिवशी एवढा पाऊस झाला की घरात पाणी आलं म्हणावं की पाण्यात घर आलं म्हणावं कळेना. बाजरीच्या ताटांपासून घराच्या भिंती उभारल्या होत्या आणि शेणामातीने त्यांना सारवून घेतल होत. त्या दिवशी रात्रभर जागून त्याने घरातून पाणी उपसून बाहेर टाकल. पहाटे लवकर उठून अंघोळ केली नि घरच्यांकडून रुपयाही न घेता तसाच तो पुन्हा नाशिकला आला. एका मित्राच्या ओळखीने नाशिकच्या मार्केट यार्डात ओझे उचलून गाडीत टाकायच काम सुरू केलं. दिवसाला 300 रुपये हाताशी येऊ लागले . दिवसभर काम करून रात्री गुरुजींकडे गाण शिकायला जाई. गुरुजींना घरची सर्व परिस्थिती माहित होती. त्यांनी ऋषीला विनामूल्य शिक्षण दिल . हळूहळू परिस्थिती बदलत गेली. गाण्याचे धडे गिरवीत असतानाच त्याने छोट्या मोठ्या कार्यक्रमात सहभाग घ्यायला सुरुवात केली. स्वतःचा एक वेगळा ठसा उमटविला. पावसाच्या गाण्यांचा एक अनोखा प्रकल्प त्याने हाती घेतला. नामांकित कवींच्या कवितांना चाली लावून गाण्याच्या स्वरुपात त्या रसिकांपर्यंत पोचवण्याचा मानस ठरला. त्यातील सर्वच गाणी त्याने स्वतःच compose केली नि स्वतःच गायली. एक गायक म्हणून ओळखला जाणारा ऋषिकेश शेलार नव्याने एक संगीतकार म्हणून ओळखला जाऊ लागला.
दुःखाची दरी ओलांडल्या शिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही हे खरंय. त्यामुळे त्याने, गाण्यासाठी ओलांडलेल्या दुःखाच्या दर्या आता त्याला इंडियन आइडल या सोनी मराठी वाहिनीवरच्या सुखाच्या हिरवळीवर घेऊन आल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम