देवळा प्रतिनिधी : सततच्या कारवाया होवूनही अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक आणि कत्तल काही थांबण्याचे नाव घेईना. बुधवारी (ता.२) सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास दोन वाहने पकडून ७ गोवंश जनावरांची देवळा पोलिसांनी कत्तलीपासून मुक्तता केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक विठ्ठल लांडगे यांना खबऱ्याकडून दोन वाहनांमधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावत लोहोणेर-वासोळ रस्त्यावर दोन मिनीट्रक (कर.एमएच.४१, एयू.१०५६ व एमएच.४१, एयू.२४७६) पकडले. यातून अनुक्रमे ४ व ३ जनावरांची कत्तलीपासून मुक्तता केली.
या प्रकरणी सहा. पोलीस उपनिरीक्षक व्ही.आर. देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन बाबुराव बच्छाव (वय ४५, रा.लोहोणेर, ता.देवळा) व प्रकाश दादाजी खैरनार (वय ५५, रा.लोहोणेर, ता.देवळा) या दोघांविरुद्ध देवळा पोलिसांनी गुरनं.४८/२०२२ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा)चे कलम ५ या, ब, ८ ई, सह भारतीय प्राणी संरक्षण कायदा १९६० चे कलम १९ (१) (घ) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या कारवाईवरून अजूनही अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम