
द पॉईंट प्रतिनिधी : तालुक्यात कोरोना संसर्गजन्य आजार आटोक्यात आला असून,एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत करावी , या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवळा येथील वाहतूक नियंत्रक बी.एस . आहेर यांना देण्यात आले .
या निवेदनाचा आशय असा की , कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने ग्रामीण भागातील सर्वच मार्गावरील एसटी बस सेवा बंद केली आहे. मात्र आता कोरोना आटोक्यात आला असून, शासनाने लागू केलेले निर्भन्ध टप्याटप्याने मागे घेतले आहेत. यामुळे जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. शाळा, महाविद्यालये देखील सुरू करण्यात आली आहेत . ग्रामीण भागात ८ वी ते १० वीचे तसेच ११ वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून, १२ वीचे वर्ग सुरू केली आहेत. एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बस सेवा सुरू केल्या आहेत . मात्र ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात बंद असलेल्या बसेस अद्याप सुरू केल्या नाहीत. यामुळे शहरात शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी कुचुंबना निर्माण झाली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होत आहेत .त्यात जाण्या येण्याची समस्या निर्माण झाल्याने पालक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व बाबींची दखल घेऊन एसटी महामंडळाने देवळा येथून सुटणाऱ्या सटाणा व कळवण आगारच्या बसेस सुरू करून विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा ,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष दिलीप आहेर , युवकचे शहर अध्यक्ष संतोष शिंदे ,जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी आदिंसह विद्यार्थी , एसटीचे टि. के. पवार , गणू देवरे उपस्थित होते .
– पत्रकार सोमनाथ जगताप
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम