ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यसरकार विरोधात एल्गार

0
55

स्वप्निल आहिरे,
द पॉईंट नाऊ : स्थानिक स्वराज्य संस्थामधील (ग्रामपंचायत) कार्यरत राज्यातील सर्व ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी नुसार शासनाने वेतनश्रेणी लागू करावी, सुधारित किमान वेतनाच्या अनुदानासाठी आर्थिक तरतुद करावी, शासन अनुदानासाठी असलेली कर वसुली व उत्पन्नाची जाचक अट रद्द करुन किमान वेतनासाठी शासनाने जबाबदारी म्हणून १०० टक्के अनुदान दयावे, निवृत्ती वेतन आणि सामाजिक सुरक्षा आदी मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासुन ग्रामपंचायत कर्मचारी विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे.

मात्र शासन याकडे जाणीवपूर्वक सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या या वेळकाढू व उदासीन धोरणाच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्धार आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या १२ व्या राज्य अधिवेशनात करण्यात आला.

११ व १२ डिसेंबरला गोंदियात पार पडलेल्या महासंघाच्या दोन दिवशीय अधिवेशनादरम्यानच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात विविध संघटनात्मक व आंदोलनात्मक ठराव मंजुर करण्यात आले. प्रलंबित मागण्यासाठी २७ डिसेंबरला जिल्हा संघटनांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांवर एकाच दिवशी मोर्चे, धरणे आंदोलने करून पुढील तीव्र आंदोलनाची नोटीस देण्यात येईल.

आंदोलनाचा दुसरा टप्पा दि.१जानेवारी २०२२पासुन ते ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण मान्य होईपर्यंत राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील बिंदू चौकातील जनसंपर्क कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यापूर्वी अनेक मोर्चे, आंदोलने झाली परंतु शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्याचा निषेध म्हणूनच हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

पुढील तीन वर्षासाठी महासंघाची नवीन कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करण्यात आली.

राज्याध्यक्षपदी प्रा.कॉ. तानाजी ठोंबरे, कार्याध्यक्षपदी कॉ. मिलींद गणवीर तर सरचिटणीसपदी कॉ. नामदेव चव्हाण आणि कोषाध्यक्ष म्हणून कॉ. तुकाराम भस्मे यांची निवड तसेच संघटन सचिव म्हणून कॉ. सखाराम दुर्गुडे, ए. बी. कुलकर्णी, मंगेश म्हात्रे उपाध्यक्षपदी कॉ. बबन पाटील, सुधीर टोकेकर, उज्वल गांगुर्डे, वसंत वाघ, हरिशचंद्र सोनवणे यांची तर चिटणीसपदी कॉ. अमृत महाजन, श्याम चिंचणे, किरण पांचाळ, निळकंठ ढोके, राहुल जाधव यांची निवड करण्यात आली. थाटात संपन्न झालेल्या दोन दिवसाच्या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या विविध जिल्हयातील प्रातिनिधी मोठया संख्येने सहभागी झाले होते .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here