द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; “आपण मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा या संकल्पनेत बंदिस्त न करता त्यांच्या विचारांना कृतीत आणणे काळाची गरज आहे. यावर्षी अखंड भारत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून आज या ७५ वर्षात मुलभूत बदल होणे अपेक्षित होते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण परिपूर्ण स्वातंत्र्याची आवश्यकता आहे.” असे उद्गार जेष्ठ विचारवंत, लेखक व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू मा. तुषार गांधी यांनी काढले.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी, नाशिक येथील महात्मा गांधी अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा वर्धापन दिन, महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे होते. “हिरे महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्यासन केंद्र आजच्या काळाला अनुरूप असे उपक्रम घेत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार या केंद्रामार्फत महाविद्यालयातील तरुणांमध्ये रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे.” असे मत डॉ. अपूर्व हिरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी अतिथी मान्यवरांचे स्वागत केले व महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल विशद केली. महात्मा गांधी अध्यासनाच्या समन्वयक डॉ. प्रगती मारकवार यांनी प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय वेबिनारचा उद्देश सांगतानाच अध्यासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण कार्यक्रमांची माहिती दिली. डॉ. रेशम भल्ला यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक, अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सरला सानप यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. राकेश पाटील यांनी आभार मानले. या आंतरराष्ट्रीय वेबिनारसाठी संस्थेच्या विश्वस्त व महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. योगिता अपूर्व हिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमासाठी सा. फु. पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, अधिसभा सदस्य तथा उपप्राचार्य डॉ. नंदू पवार, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या डॉ. सुचिता सोनवणे, मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ मृणाल भारद्वाज, इस्टेट सुपरवायझर डॉ. एस. डी. पाटील, मानव संसाधन आणि वित्त विभागाचे सुपरवायझर डॉ. विनीत रकिबे, शैक्षणिक व परीक्षा विभागाचे सुपरवायझर डॉ. संतोष चोबे, प्रा. एस. एन. भदाणे महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, गांधी विचारांचे अभ्यासक, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम