कोंबडीच्या ‘तंगडीने’ केली लोकशाही ‘लंगडी’

0
57

-अंकुश सोनवणे
संपादकीय : सध्या राज्यात नगरपंचायत नगरपालिका निवडणूक सुरू असून, यात चंगळवादी कार्यकर्त्यांचे ‘सबकुछ मंगल है’ कारण बाटली न तंगडी सध्या जोमात सुरू झाली आहे. माघारीला वेळ असतांना, तिकीट फायनल नसतांना देखील महिनाभर आधीच गल्लोगल्ली, कॉलनीत पार्ट्या, कॅम्प सुरू झालेत, मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकशाही पूजक देशात आमिष दारू, अन चिकन, मटण वर भर दिला जातोय हे देशासाठी घातकच आहे. याच दारु अन मटणाच्या हव्यासापोटी देशाची लोकशाही मात्र लंगडी केली आहे.

भारताच्या लोकशाहीचे जसे समर्थक आहेत, तसेच टीकाकार देखील आहेत, या लोकशाहीत विकासा ऐवजी आमिषाला महत्त्व देऊन मतदान विकत घेतले जात असेल तर ही तोकडी लोकशाही नक्कीच मोडीत निघेल हे पण खर आहे. लोकशाहीच्या उत्सवात जनतेने चांगले लोकप्रतिनिधी निवडुन देणं अपेक्षित असतांना, तरुणाई एखाद्या नेत्याच्या मागे चाटुगिरी करून मैदानात झेंडा घेऊन उतरते मात्र त्याला कुठलाही वैचारिक अजेंडा नाही, घरातील करता युवक व्यसनाच्या आहारी लावण्याचे काम राजकिय पुढाऱ्यांनी सुरू केलं आहे. देशाचा कणा म्हणून तरूणाईकडे बघितले जातेय मात्र हा ‘कणा चण्या’ सोबत बाटलीत उतरवला जातोय हे अतिशय धक्कादायक आहे.

नेत्यांनी जर वैचारिकतेवर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना झेंडे उचलण्यासाठी देखील कोणी मागे नसेल, हुजरेगिरी करणारे कार्यकर्ते नसतील हे नेत्यांना माहिती आहे, यामुळे पद्धतशीरपणे पिढी बरबादीचे व्रत नेत्यांनी हाती घेतल्याचे चिन्हे आहेत. देशातील कानाकोपऱ्यात भ्रष्टाचार फोफावत आहे याला जबाबदार आपण सर्वसामान्य नागरिक आहोत. आपण वेळीच स्वतःला आपल्या पोराबाळांना गैरकारभार करण्यापासून रोखले, मतदानासाठी दारू, मटण, पैसे घेण्यासाठी रोखले तर परिवर्तन अटळ आहे.

उमेदवारांना निवडून देतांना नातेवाईक, भाऊबंदकी, मित्र हे न बघता उमेदवारांची वैचारिक लेव्हल, काम करण्याची पद्धत त्याचा प्रामाणिकपणा हे बघणं महत्त्वाचे आहे. असे झाल्यास आपल्याला शहराची पर्यायाने देशाची प्रगती झालेली दिसेल. त्यासाठी प्रत्येक आरशासमोर उभे राहून आपली स्वतःची लायकी अन सकारात्मक नकारात्मक गुण तपासणे महत्त्वाचे आहे.

नगरपंचायत निवडणुकीत आई वडिलांनी आपला मुलगा कोणाच्या पंगतीला बसलाय जरा याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा बाहेरची दुर्गंधी आपल्या घरात शिरकाव करून बरबादीला कधी सुरुवात होईल हे आपल्याला कधी समजणार देखील नाही. अन मतदान करतांना जरा प्रामाणिक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणं म्हणजे लोकशाही बळकटीस हातभार लागण्या सारखच आहे , आपले कर्तव्य म्हणून यात प्रत्येकाने हिरारीने उतरावे इतकंच शेवटी म्हणता येईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here