सामान्यतः सुखी जीवन आणि आरोग्यदायी जीवनशैली हे मानवाचे अधिकार आहेत. कार्यालयीन कामकाज, आजचे धकाधकीचे जीवन यामुळे माणूस आपल्या मानसिक , शारिरीक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करत चालला आहे. मात्र, आपल्या या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम देखील होत आहे याची जाणीव माणसाला होत नाही.
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात जगात असताना माणूस मानसिक दृष्टीने खूपच खचून जातांना दिसत आहे. आपण आपल्या शरीराला सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी योग्य आहार घेत असतो मात्र मानसिक स्वास्थ्यासाठी सहसा काहीही करत नाही. आजच्या व्यस्त दिनचर्येमध्ये शनिवार, रविवार सुट्टी काढून आपण so called weekend साजरा करत असतो. मात्र हा weekend आपल्या मानसिक तणावाला घालवण्यासाठी पुरेसा आहे काय?
माणूस मनापासून आनंदी असेल तर सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होत असतात. मात्र इतक्या तणावात आनंदी राहणे कसे काय जमणार हा विचार आजच्या तंत्रज्ञान युगात जगणाऱ्या माणसाला नेहमीच पडत असतो. यासाठी खालील काही मुद्द्यांवरून तुम्ही नक्कीच तुमचे मानसिक आरोग्य आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू शकता-
जीवनाचा आनंद लुटा- प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या कला वेगळ्या असतात. मात्र आपण हे जगात असतात आपण भूतकाळात आणि भविष्य काळात अडकून आपला वर्तमान नेहमी गमावत असतो. यासाठी आज आपण जसे आहोत जिथे आहोत तसे स्वतःला स्विकार करा आणि आपल्याला ज्या कामात रुची वाटते त्या कामात प्रावीण्य मिळवून जीवनाचा आनंद कसा लुटता येईल याचा विचार करा. उदा. आपल्या कार्यालयीन कामकाजासोबत एखादी कला जपा आणि त्यात नैपुण्य मिळवा.
आपल्या माणसांच्या आनंदात सहभागी व्हा-
कधी कधी आपल्या कामात आपण इतके व्यस्त होऊन जातो की आपल्या जवळ देखील काही लोक आहेत याचा आपल्याला विसर पडतो. मात्र आपल्या माणसांचा आनंद जपणे यात जीवनातील सगळ्यात मोठा आनंद दडला आहे. आपण आपल्या आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवले तर आपले आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत मिळते. या सगळ्या बाबींमुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते परिणामी तुमचे मन प्रसन्न राहण्यास मदत मिळेल. वैज्ञानिक दृष्टीने जर तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होत असाल तर तुमच्यातील सकारात्मक ऊर्जेचा विकास होत असतो.
आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवा-
आनंदी व्यक्तींशी बोलायला सगळ्यांनाचं आवडत असते. त्यामुळे तुम्ही पडलेला चेहरा घेऊन जर कोणाकडे गेलात तर समोरचा व्यक्ती देखील नकारात्मक भावनेत अडकून तुमच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. मात्र तुम्ही तुमचे तणाव विसरून लोकांशी हसत खेळत आणि आनंदी बोलत असाल तर यामुळे पुढचा व्यक्ती देखील तुमच्याकडे आकर्षित होतो आणि यामुळे तुमच्या तणावाला देखील कुठेतरी पूर्णविराम लागत असतो.
मोकळे बोला-
बऱ्याच वेळा व्यक्ती आपल्या मनातील दुःख कोणाला सांगायला घाबरत असतो. त्याला नेहमी भीती असते की या मुळे मी पुढच्याला कमजोर आहे असा गैरसमज होईल अथवा याचा कोणी फायदा घेईल, ही भीती नेहमी कुठे न कुठे माणसाला खात असते. मात्र आपल्या जवळच्या मित्राला, व्यक्तीला हक्काने तुमच्या मनातील तणाव तुम्ही मोकळा केला तर यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य समतोल राहण्यास खूप मदत मिळत असते. मात्र यासाठी व्यक्तीची पारख करून या सगळ्या गोष्टी सांगणे महत्वाचे ठरते.
मी सुखी आहे या मानसिकतेत जगा-
या जगात फक्त मलाच दुःख आहे. मलाच खूप तणाव आहे अशा मानसिकतेत व्यक्ती कधी कधी जगत असतो. मात्र या विचाराच्या पलीकडे गेलात तर आपल्याला मुळात दोन वेळच खायला मिळतं हीच बाब मुळात खूप आनंददायी आहे. म्हणून स्वतःला अशा नकारात्मक सुचना देण्यापेक्षा माझ्या कामातून मला आनंद कसा मिळेल आणि स्वतःला सकारात्मक दृष्टिकोन कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. यासाठी आपल्या कला जप मग पहा आयुष्य कसं सुंदर होतं.
आपले मानसिक आरोग्य मित्रांनो हे आपल्याच हातात असते. आपण आपल्या मनाला , शरीराला ज्या सवयी लावू त्या प्रमाणे आपण घडत असतो म्हणून आजूबाजूच्या परिस्थितीचा फारसा विचार करू नका तुम्हाला जे करायला आवडते ते करायला सुरुवात करा आणि आपले मानसिक स्वास्थ्य निरोगी आणि आनंदी ठेवा. कारण माणसाच्या शारीरिक आरोग्यपेक्षा माणसाचे मानसिक आरोग्य उत्तम राहणे गरजेचे असते. यासाठी हसा, नव्या नव्या लोकांशी मैत्री करा दिलखुलास जगा नवीन ठिकाणांना भेट द्या आपल्या माणसांची काळजी घ्या मित्र परिवार यांना आनंदी ठेवा आणि भविष्याची चिंता करू नका हाच मूळ मंत्र जपा आणि आपले आरोग्य आपणच जपा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम