स्वप्निल आहिरे,
आराई प्रतिनिधी : राज्य शासनातर्फे जलव्यवस्थापणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाणीवापर संस्थांना महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आराई गावाच्या बागायतदार पाणीपुरवठा संस्थेस मिळाला.

संस्थेच्या सुक्ष्म नियोजन, पाणी बचत तसेच आर्थिक ताळेबंद व गावाच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाच्या आधारावर तपासणी होऊन राज्यातून जाहीर होणाऱ्या तीन पुरस्कारापैकी आराई बागायतदार पाणीपुरवठा संस्थेला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे संपन्न झाला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. तीन लाख रुपये रोख , स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. बागलाण तालुक्यातील केळझर प्रकल्पांतर्गत असणाऱ्या आराई संस्थेअंतर्गत ५०० एकर क्षेत्र संस्थेच्या अखत्यारीत असून काटेकोर पाणी नियोजन, शंभर टक्के पाणी पट्टी वसुली व पाण्याच्या वापराबद्दल केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे तसेच संस्थेसाठी मिळणारे पाण्याचे रोटेशन व सर्व शेतीसाठी पाण्याचे नियोजन विद्यमान सभापती नंदकुमार त्र्यंबक आहिरे यांनी शक्य करून दाखविल्यामुळे यापूर्वी संस्थेला ट्रॅक्टर, शेती उपयोगी अवजारे बक्षीस म्हणून मिळाली आहेत.
उत्कृष्ठ नियोजनामुळे संस्थेला अनेक संस्थांनी सुद्धा गौरविले आहे. यावेळी संस्थेचे सभापती नंदकुमार आहिरे, उपसभापती शंकर आहिरे, तुळशीराम सोनवणे, राजन आहिरे, धर्मराज अहिरे,केदार सोनवणे, गोकुळ अहिरे, प्रवीण अहिरे, देवेंद्र सोनवणे, प्रविन पोपट अहिरे, बाळासाहेब सोनवणे, बाळुबाई पवार, सुनंदा आहिरे, बन्सीलाल सोनवणे, शंकर गोसावी, बापूराव भामरे, अवचित आहिरे ,नितीन बोरसे, दिलीप आहिरे, दयाराम आहिरे, धर्मा माळी, आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम