राज्यात येत्या दोन आठवड्यांत मॉन्सून परतीच्या प्रवासावर; हवामान खात्याचा अंदाज

0
45

मुंबई : देशात मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात तीन दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आज राजस्थानमधून मॉन्सून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातून पाऊस माघारी फिरणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

देशात २९ मे रोजी मॉन्सूनने भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर सर्वांत शेवटी २ जुलैला पश्चिम राजस्थानाच्या भागात प्रवेश करून संपूर्ण देश व्यापला होता. दरम्यान, मध्य भारत आणि दक्षिणेकडील बहुतांश भागात कमी दाबाच्या पट्ट्यांचा सर्वाधिक लाभ मिळाल्याने तिकडे यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. मात्र, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही भागांना पावसाचा फटका बसला असून या विभागांत सरासरीच्या तुलनेत अद्यापही कमी पावसाची नोंद झाली आहे.

तिकडे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक २६ टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे. तसेच दक्षिण-उत्तर राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून निर्माण झालेली कोरड्या हवामानाची स्थिती, कमी झालेली आर्द्रता आणि वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल लक्षात घेता यंदा तीन दिवस उशिराने मॉन्सून परतीच्या दिशेने जात आहे. साधारणतः दहा ते पंधरा दिवसांनी म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातील काही भागांत पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस होणार आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here