मका बियाणे निकृष्ट निघाल्याने देवळ्यात शेतकरी अडचणीत, शेतकऱ्याची कंपनीविरुद्ध तक्रार

0
45

देवळा : एका बी-बियाणे उत्पादक कंपनीने बोगस मका बियाणे देऊन फसवणूक केल्याची तक्रार वाजगाव येथील शेतकऱ्याने देवळा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. वाजगाव येथे मका बियाण्यात फसवणूक झाल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरवर्षी बियाण्यात फसवणूक झाल्यानंतर केलेल्या तक्रारींचा काहीच उपयोग होत नसल्याची शेतकऱ्यांची भावना झाल्यामुळे तक्रार करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. त्यातच तक्रारीबाबत शासनाची उदासीनता व कारवाईबाबत होणाऱ्या दिरंगाईचा बी- बियाणे कंपन्या फायदा घेऊन करोडो रुपयांची कमाई करीत असतात.

वाजगाव येथील शेतकरी संजय मनोहर देवरे यांनी कळवण येथील बी- बियाणे विक्री करणाऱ्या दुकानातून एका कंपनीच्या मका बियाण्याच्या १३ पिशव्या (वजन प्रत्येकी ४ किलो) खरेदी केल्या व ह्या बियाण्याचीवाजगाव येथील आपल्या गट नं. ३८०, व गट नं. ३८२ क्षेत्रावर २ हेक्टर ९८ आर क्षेत्रात पेरणी केली. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली आहे.

वातावरण पूरक असताना एका विशिष्ट कंपनीचे बियाणे वगळता इतरत्र मक्याची उगवण चांगली झाली आहे. तक्रारीत शेतकऱ्याने म्हटले आहे की, सदरचे मका बियाणे हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे शेतात पेरलेला मका उगवलाच नाही. यामुळे ह्या शेतकऱ्याने चालू वर्षी मका पिकाच्या लागवडीसाठी केलेला सर्व खर्च वाया गेला असून उत्पन्न बुडाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पंचायत समितीस्तरावरून चौकशी करण्यात यावी तसेच सदर बियाणे उत्पादक कंपनीवर योग्य ती कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई बियाणे कंपनीकडून मिळवून द्यावी, अशी मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे. वाजगाव येथील भाऊसाहेब बन्सीलाल देवरे ह्या शेतकऱ्याने कळवण येथील सदरच्याच दुकानातून त्याच बियाणे कंपनीच्या ६ मका पिशव्या घेतल्या होत्या. आपल्या १ हेक्टर २० आर क्षेत्रावर पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नसल्याचे म्हटले आहे.

पंचनाम्यास दिरंगाई

बोगस बियाण्याबाबत दरवर्षी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी पंचायत समितीकडे येतात. याबाबत तातडीने दखल घेऊन कारवाई केली जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. खरिपाचा हंगाम वाया जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांना त्वरित दुसरे पिकाची पेरणी करावयाची असते. परंतु शासनातर्फे पंचनामा करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे शेतकरी कंटाळून नाद सोडून देतात व शेतात पेरणी करून खरीप हंगाम पदरात पाडून घेतात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here