विष्णू थोरे चांदवड : येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाईं भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकीच्या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी नवीन अत्याधुनिक फवारणी यंत्र विकसित केले.
पारंपरिक फवारणी पद्धतीत अनेक दोष असून कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी थेट कीटक नाशकाच्या संपर्कात येतो. त्यातून काहीजण अत्यवस्थ होऊन मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. आतापर्यंत अनेक शेतकरी बांधवांना विषबाधा झाली आहे. तसेच अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच ट्रॅक्टर चालवणाऱ्या व्यक्तीला मणक्यांचा आजार लागू शकतो.
सदर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून शेतकरी कुटुंबातील आहेत. शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी करावे असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांनी मल्टि परपझ ऍग्रीकल्चर रोबोटची निर्मिती केली.
हा रोबोट रिमोट वर चालतो शेतात फवारणी करण्यासाठी शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर बसून हा रोबोट चालवू शकतो. त्यामुळे शेतकरी कीटक नाशकाच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे विषबाधा व कुठलीच शारिरीक व्याधी होत नाही.
हा रोबोट इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असून चार्जिंग नंतर साधारणतः एक तास बागेत फवारणी करू शकतो.यात फोर व्हीलर ड्राईव्ह या संकल्पनेचा वापर केला असून रोबोट चिखलात फसण्याचा प्रकार घडणार नाही. तसेच रोबोट चालवणे, पंप मीटर, गवत कापण्याची, मीटर चालू व बंद करणे हे रिमोटवर ऑपरेट होणार आहे. त्यामुळे शेतकरी शेताच्या एका बाजूला बसून रिमोट वर हा रोबोट चालवू शकतो. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी लागणारा इंधन खर्चाची बचत होणार असून, पिकांची नासाडी टाळता येणार आहे व वेळेची बचत होणार आहे.
या रोबोट मध्ये ६० लिटरची टाकीचा वापर फवारणी द्रावण ठेवण्यासाठी केला आहे. त्यास दोन्ही बाजूने नोजल दिले आहे. त्या नोजलला एका ठराविक कोनात हालचाल करून बागेला फवारणी करणार. यामुळे कीटक नाशकाची नासाडी कमी होणार आहे. नोजलची उंची अॅड्जस्ट करता येणार आहे. त्याद्वारे बागेच्या एका गल्लीत फवारणी करता येते.याचा फायदा शेतकरी बांधवांना नक्कीच होणार आहे.
या रोबोट साठी जवळपास ३० हजार रुपये खर्च आला आहे. आजूबाजूच्या द्राक्ष व डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे . सदर प्रोजेक्ट साठी नामदेव पवार, जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल अमोल ठाकरे यांनी परिश्रम घेतले असून प्रा. एस.पी इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
या यशामुळे संपूर्ण चांदवड तालुक्याचे नाव उंचावले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे वाढते यश नक्कीच सुखावह आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम .आर. संघवी, व यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस.डी. संचेती आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
झुंबरलालजी भंडारी,
आमचे विद्यार्थी आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचा विशेष आनंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांशी थेट संपर्क येऊन होणारी हानी टाळता येणार आहे.
– झुंबरलालजी भंडारी,
सहमानद सचिव प्रबंध समिती, श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम, चांदवड.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा