

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून , यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तिकरित्या तीस रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करून,शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,या मागणीचे निवेदन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने (दि ३०) रोजी देवळा तहसीलदाराना देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की , सध्या कांद्याला जो दर मिळत आहे त्यामध्ये उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. भाव मिळेल या आशेने चाळीत साठवणूक केलेल्या कांद्यामध्ये सड होण्याचे व वजन घटण्याचे प्रमाण जास्त आहे . त्यातच आता कांद्याचे दर 12-15 रूपये प्रति किलो इतके खाली आल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने संयुक्तरित्या थेट शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो या दराने सरसकट खरेदी करून हा कांदा परराज्यात व परदेशात पाठवावा व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा कांदा उत्पादक संघटनेकडून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भारत दिघोळे संस्थापक अध्यक्ष, शैलेंद्र पाटील राज्य प्रवक्ते , जयदीप भदाणे कोअर कमिटी सदस्य तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष ,कुबेर जाधव संपर्क प्रमुख , कृष्णा जाधव संघटक , शिवाजीराव पवार देवळा तालुका अध्यक्ष, भगवान जाधव नाशिक जिल्हा समन्वयक , किरण सोनवणे देवळा तालुका युवा अध्यक्ष, समाधान गुंजाळ देवळा तालुका युवा उपअध्यक्ष आदींच्या सह्या आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम