देवळा प्रतिनिधी : अर्ली द्राक्षांची माघील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील वाजगांव व कनकापूर येथील द्राक्ष उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाल्याने तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आ डॉ सुधीर तांबे यांनी शुक्रवारी दि १० रोजी वाजगांव येथील द्राक्ष उत्पादक बळीराम नथु देवरे व भूषण देवरे यांच्या बागांना भेट देत पहाणी केली.

येथील गौरव देवरे यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत द्राक्ष उत्पादकांची व्यथा दूरध्वनीवरून सांगितल्यानंतर आ सुधीर तांबे यांनी वाजगांव येथे भेट दिली. येथील बळीराम देवरे यांचं लागोपाठ तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागेचे नुकसान झाले. मोठ्या कष्टाने कुटुंबियांसह काबाडकष्ट करून उभी केलेली द्राक्ष बाग काढणीला आलेली असताना अवकाळी पावसाने शंभर टक्के नुकसान आहे.
अवकाळी पावसाने या भागातील सर्वच द्राक्ष बागांना फटका बसला असून यंदाचा हंगाम देखील वाया गेल्याचे विदारक चित्र द्राक्ष उत्पादकांच्या बागांना भेट दिल्यानंतर दिसल्याचे आ डॉ सुधीर तांबे यांनी सांगितले.
वाजगाव ता देवळा येथील बळीराम देवरे व भूषण देवरे यांच्या बागाना भेट देत नुकसानीची पाहणी केली. द्राक्ष उत्पादक भूषण देवरे, बळीराम देवरे यांच्या बागेतील द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन झाडावरच द्राक्ष कुजले आहेत. मागील सलग दोन वर्षी देखील काढणीला आलेल्या द्राक्षांचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदा देखील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनतीने निर्यातक्षम द्राक्ष तयार केले होते. मात्र काढणीला आलेल्या द्राक्ष बागेचे नुकसान प्रचंड झाले आहे. हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या पाठीशी असून मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांच्यापर्यंत या भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणार असल्याचे आश्वासन यावेळी आ डॉ सुधीर तांबे यांनी दिले.
यावेळी गौरव देवरे व राजेंद्र देवरे ,प्रमोद देवरे यांनी द्राक्ष उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीचे निवेदन आ सुधीर तांबे यांना दिले. द्राक्ष उत्पादक भूषण देवरे,बळीराम देवरे,सुनिल देवरे यावेळी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम