दिल्ली – झारखंड विधानसभेत आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सभागृहात ठरावावेळी भाजपने सभात्याग केला, हे विशेष.
झारखंड विधानसभेत ८१ सदस्यांच्या सभागृहात आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला. ज्यात सोरेन यांच्या बाजूने ४८ मते, तर विरोधात एकही मत पडले नाही. आणि सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले. त्यानंतर विधानसभेचे कार्यवाही अनिश्चितकाळासाठी स्थगित केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सोरेन म्हणाले, विरोधकांनी लोकशाही नष्ट केली आहे. भाजपने आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच आज आम्ही विधानसभेत आपली ताकद दाखवणार आहोत. हे अधिवेशन लोकशाही वाचवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. तसेच भाजप हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर भाजपचे नीलकंठ मुंडा म्हणाले, झारखंडचे जनता घाबरली आहेत. विरोधकांनी, कोर्टाने अथवा राज्यपालांनी विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितले नाही, तरीदेखील सरकार का घाबरले असा सवाल त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले असून मुख्यमंत्री असताना त्यांनी खाणीचा पट्टा स्वत:च्या नावावर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस राज्यपालांना केली आहे. मात्र, राज्यपालांनी यावर कोणताही अधिकृत निर्णय घेतला नाही. म्हणून, आपल्या सरकारवरील संकट टाळण्यासाठी हेमंत सोरेन झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसच्या आमदारांसह छत्तीसगडची राजधानी रायपूरला गेले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम