मुंबई: देशात धर्मांतराचे लोन विस्तारले असून वेगवेगळे आमिष दाखवत हे जाळे वाढत आहे राज्याचं पावसाळी अधिवेशन सद्या सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिवेशनात विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे. आज धर्म परिवर्तनाचा मुद्दा चांगलाच गाजला. आमदार नितेश राणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाचा विषय उपस्थित केला. व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार नितेश राणे यांनी आज सभागृहात धर्मांतराच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडत. राज्यात धर्मांतर करणारं एक मोठं रॅकेट असून, धर्मानुसार आणि जातीनुसार त्यांच रेटकार्ड ठरलेलं आहे असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. धर्मांतरात अल्पवयीन मुलींना फसवलं जातं आहे. यावेळी नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये झालेल्या धर्मांतर प्रकरणाचा पुरावा दिला. तसंच या प्रकरणात आरोपी आणि पोलिसांचं साटंलोटं असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केल आहे.
धर्मांतरासाठी ‘रेट कार्ड’, नितेश राणेंचा गंभीर आरोप
राणे आज सभागृहात बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्रात धर्मांतर हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. श्रीरामपूर येथील घडलेली गंभीर घटना असून, धर्मपरिवर्तनाच्या नावाखील एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं तिच्यावर अत्याचार केले जातात, त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर बराच वेळानं आरोपीला पकडून कारवाई केली जाते. त्यावेळी आजूबाजूच्या समाजाकडून कारवाई न करण्यासाठी दबाव टाकतात. या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्याचे आरोपीसोबत आर्थिक व्यवहार आहेत. आरोपीला घरचं जेवण दिलं जातं. आरोपीला मदत केली जाते, अशी चर्चा आसपासच्या परिसरात आहे.” याची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.
राज्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली त्रास दिला जातोय. अनेक अल्पवयीन मुलींना त्रास दिला जातो. फसवण्यासाठी मुलांना आर्थिक ताकत दिली जाते. यासाठी रेट कार्ड आहे की, शीख तरुणीला फसवलं तर किती? हिंदू मुलीला फसवलं तर किती? असे रेट कार्ड आहेत. एवढ्यावरच ते थांबत नाही, तर त्या मुलींना विकण्यापर्यंत गोष्टी जातात. याप्रकरणातील सानप नावाचे पोलील अधिकारी आहेत, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. अशा घटना घडत आहेत, यांच्यावर आळा बसण्यासाठी आपल्या राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू करणार का ?” , असं म्हणत राणे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे.
या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नितेश राणे यांनी मांडलेला विषय गंभीर असून पीडित अल्पवयीन असताना सातत्यानं तिच्यावर तीन वर्ष अत्याचार करण्यात आला. तक्रार दाखल होऊनही पोलीस अधिकारी सानप यांनी कारवाई केली नाही. हे उघडकीस आल्यानंतर पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. नितेश राणे यांनी मागणी केल्याप्रमाणे लगेच बडतर्फ करता येत नाही, पण त्यांना कडक शिक्षा करू. आरोपीसोबत त्यांचे संबंध आहेत का? हे तपासलं जाईल. तसं काही आढळलं तर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करू. आरोपीवरही मोठ्या प्रमाणात गुन्हे आहेत. त्याचे सर्व गुन्हे तपासून विशेष कायदा अंतर्गत कारवाई करता येईल का? हे लक्षात घेऊन कारवाई करू.” पुढे बोलताना राज्यात धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे. जबरदस्ती कोणी कुणाचं धर्मांतर करू शकत नाही. या तरतुदींमध्ये कमतरता असेल तर अभ्यास करून या तरतुदी ताकदवर करू, कुठेही आमिष देऊन किंवा जबरदस्ती करून कोणाचे धर्मांतर करता येत नाही, असंही फडणवीस यांनी सांगितले.
निलंबित करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार ? : अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “या प्रकरणात सानप यांचं निलंबन केलं. त्यापाठोपाठ तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्यामुळे पोलीस नाईकालाही निलंबित केलं असून आपल्या पोलीस खात्यात निलंबन झाल्यानंतरही पोलिसांना काही वाटत नाही. कारण त्यांचा अर्धा पगार त्यांना मिळतो. ते पोलीस असल्यासारखेच वावरत असतात. त्यामुळे कायद्यात काही बदल करुन निलंबित करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार का असा सवाल देखील केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम