मुंबई – सध्या डिझेलचे दर जास्त असून ते शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना डिझेलवर सबसिडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
विधिमंडळातील चर्चेत बोलताना आमदार नाना पटोले म्हणाले की, “महागाईने जनता त्रस्त असून पेट्रोल, डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. शेतकरी नेहमीच संकटाचा सामना करत असतो. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. तसेच जीएसटीची व्याप्ती वाढवून केंद्र सरकार अनेक जीवनावश्यक वस्तूही जीएसटीच्या कक्षेत आणून कराचे ओझे सामान्य जनतेवर टाकत आहे. नुसताच कर कमी करून जरी पेट्रोल-डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले असले तरी अजूनही शेजारच्या राज्यातील पेट्रोल डिझेलच्या दरांशी तुलना करता महाराष्ट्रातील दर हे जास्तच आहेत.”
दूध, दही, पनीर, आटा यांसह शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. शहरी भागात १५ हजार रुपये महिना कमावणाऱ्या कुटुंबालाही या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती पाहता पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा तसेच शेतकऱ्यांना डिझेलवर सबसिडी देण्यासंदर्भात विचार करावा व तसा निर्णय घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम