सोयाबीनचे बाजार भाव कोसळले ; अजून महिन्याभर भाववाढीची प्रतीक्षा

0
30

लातूर प्रतिनिधी : सोयाबीनच्या भावात सारख चढ उतार होत असून दीड महिन्यापूर्वी ७ हजार १०० रुपयांपर्यंत भाव गाठलेल्या सोयाबीनच्या दरात ८०० रुपयांची घसरण झाली. शिवाय, महिनाभरापासून ६ हजार २०० रुपयांवर दर स्थिर आहेत. त्यामुळे काही दिवसांत दर वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी विक्री थांबविली आहे. परिणामी, बाजारपेठेतील आवकही घटल्याने पुढील बाजार भाव काय असतील याची शक्यता वर्तवता येत नाही.

जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सोयाबीनचा सर्वाधिक पेराव झाला होता. पीकही चांगले बहरले होते, परंतु ऐन काढणीच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने अतोनात नुकसान झाले. त्यातून बचावलेल्या पिकांची काढणी केली. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने सोयाबीनची विक्री केली. मात्र, यंदा सर्वाधिक भाव मिळाल्याने आगामी काळातही चांगला दर मिळेल, म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी साठवणूक केली आहे.

दिवाळीनंतर बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. सुरुवातीस ५ हजार रुपये प्रति क्विंटल मिळणारा दर हा ७ हजारांपर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. आगामी काळात आणखीन दर वाढेल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली.

दरम्यान, पुन्हा दरात ८०० रुपयांनी घसरण होऊन ६ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. महिनाभरापासून हा दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करणं थांबविले आहे. आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी गरजेनुसार सोयाबीन विक्री करीत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीतही सोयाबीनची आवक घटली असल्याचे पाहावयास मिळत आहे येथील बाजार समितीत ठरावीक प्रमाणात आवक होत असल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात दरात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना आश आहे. त्यामुळे सध्या शेतकरी सोयाबीन विक्री करणे टाळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दर वाढल्यानंतर आवकही वाढण्याची आशा असल्याचे व्यापारी म्हणाले.

दरवाढीची काही दिवस प्रतीक्षा…

बियाणे आणि खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा मोठा फटका बसला. शेतातील सोयाबीन काढणीसाठी जादा खर्च करावा लागला. त्याच्या तुलनेत मिळणारा भाव हा कमी आहे. दीड महिन्यातच जवळपास ८०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन विक्री करणे परवडणारे नाही. नुकसान सहन करण्यापेक्षा काही दिवस दर वाढीची प्रतीक्षा केलेली बरी, असे शेतकरी वसंत पवार यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here