द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शेतकरी गेल्या काही वर्षापासून अनेक संकटांना सामोरे जात असून, आता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्यामध्ये खतांची एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी केंद्र चालक स्वतः च्या फायद्यासाठी बोगस खताची विक्री करत असल्याची चर्चा तालुकाभर रंगत आहे. जादा भावाने विक्री करणाऱ्या तसेच बोगस खत विक्री करणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाईची मागणी होत आहे ? तालुक्यामध्ये परवानाधारक संख्या आणि. परवाना ई-पॉस मशीन देण्यात आलेली संख्या यात तफावत आहे, काही कृषी केंद्र चालकाकडे ई-पॉस चालू स्थितीत आहे तर काहींकडे मशीन बंद अवस्थेत आहे.
ई-पॉस मशीन उपलब्ध नाही. रब्बी हंगामातील पिकांची वाढ होण्यासाठी शेतकरी खतांचा वापर करत असून, सद्या २०:२०:०:१३ खत, डीएपी खत, १५:१५:१५ खत, अमोनिया सल्फेट खतासह इतर खतांची एमआरपी पेक्षा जादा भावाने विक्री होत आहे. कृषी केंद्र चालकाकडून एका खतांच्या बॅग मागे तब्बल २०० ते ४०० रुपये जादा घेत आहे.
शेतकऱ्यांना खतांची गरज असल्यामुळे जादा पैसे देऊन शेतकरी सध्या खत विकत घेत आहे. त्यामध्ये काही कृषी केंद्र चालक बोगस खताची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे सुशिक्षित शेतकरी खासगीत सांगतात. त्यावर कोणत्याही प्रकारचे लेबलसह इतर गोष्टी संशयास्पदमध्ये असतात.
विशेषतः शहर व ग्रामीण भागामध्ये खताची गोडाऊन मध्ये साठवणूक केली जाते. परंतु, त्यामध्ये नगण्य प्रमाणात मुळ कंपनीचे खत ठेवल्या जाते तर बाकीचे बोगस खताची साठवणूक केली जाते. कृषी केंद्र चालक सुद्धा बोगस खात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना देतात. त्याचा परिणाम पिकांवर होऊन उत्पन्नामध्ये घट होते. तालुक्यातील कृषी केंद्र चालकांवर प्रशासनाकडून ठोस कारवाई होते का? हेच पाहावे लागणार आहे ? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
बड्या खत विक्री करणाऱ्यांवर कारवाईची गरज बड्या खत विक्री करणारा चालकावर कडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून चोर सोडून संन्याशाला फाशी देत असल्याचे काही कृषी केंद्र चालकांनी सांगितले. कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा साठा आहे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. परंतु, त्यांच्याकडे कमी साठा आहे त्यांच्यावरच कारवाई केल्या जात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे बढ्या खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी केंद्रातून ई-पॉस मशीन गायब
तालुक्यातील कृषी केंद्रांमधील ई-पॉस मशीन गायब झाल्याचे सद्या पाहायला मिळते. वास्तविक पाहता प्रशासनाकडून खतांची विक्री करताना कृषी केंद्र चालकांनी ई-पॉस मशीनचा वापर करून शेतकऱ्यांना खत विक्री करण्याचे निर्देश असतानासुद्धा तालुक्यातील कृषी केंद्र चालकाकडून प्रशासनाने दिलेल्या निर्देशाला केराची टोपली दाखवली आहे. ई-पॉस मशिनच्या साह्याने शेतकऱ्यांना खताची वाटप झाली तर शेतकऱ्यांना आर्थिक भुदंड बसणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पॉस मशीन च्या माध्यमातून खते देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सद्या रब्बीचा हंगाम चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना खताची आवश्यकता असते. परंतु, कृषी केंद्र चालकांकडून जादा भावाने खत विक्री करावे लागते. त्यांच्याकडून कोणतेही पक्के बिल दिल्या जात नाही. अशा कृषी केंद्र चालकांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला शेतकरी निसर्गाकडून होरपळत आहे तर दुसऱ्या बाजूला कृषी केंद्र चालक सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न सध्या उभा राहिला आहे.
– श्रीकांत डोईफोडे, शेतकरी नेते, सिंदखेड राजा.
कृषी केंद्र चालकांकडून जादा भावाने खत विक्री जादा भावाने होत असल्यास त्याची तत्काळ माहिती शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या प्रशासनाला दिली पाहिजे. प्रशासनाकडून संबंधित कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांनी देवू नये.
– वसंतराव राठोड, -तालुका कृषी अधिकारी, सिंदखेड राजा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम