मालेगाव प्रतिनिधी : महाराष्ट्रात कांदा उत्पादन वाढणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात यावर्षी विक्रमी उन्हाळी कांदा लागवड झाली आहे. पाण्याची उपलब्धतता असल्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न येण्याची शक्यता आहे. निर्यात वाढल्यास भाव टिकून राहतील. अन्यथा शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागेल ही वस्तुस्थिती आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी शरद पवार यांना मालेगाव बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव व शिष्टमंडळाने केली आहे. कांद्याची निर्यात वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देखील पवार यांनी या वेळी दिले आहे.
मालेगाव बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मा. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी कांदा व डाळींब पिकाबाबत माहिती जाणून घेत. गेल्या तीन वर्षापासून कसमादेसह नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. वर्षापासून कांद्याचे भाव टिकून आहेत. पाण्याची उपलब्धता असल्यामुळे यावर्षी नाशिक जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी कांदा लागवड करण्यात आल्याची माहिती पवारांना दिली.
यावर्षी कांदा बाजारभाव निर्यात वाढली तरच टिकून राहतील. निर्यात कमी झाली तर भाव कोसळण्याची भीती आहे. निर्यात वाढीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती पवार यांना केली आहे. कांदा निर्यात वाढीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पवारांनी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पवार यांनी मालेगावातील यंत्रमाग, फळशेती याबाबत सभापती जाधव यांच्याकडून माहिती जाणून घेतली. या वेळी रमेश मोरे, विलास सोनजे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी पारंपारीक गहू, हरभरा या रब्बी पिकाऐवजी उन्हाळी कांद्याला पसंती दिली आहे. नोव्हेंबरपासून कांदा लागवड सुरु झाली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उन्हाळी कांदा लागवड करण्यात आली. यावर्षी मजुरांवरतसेच रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात खर्च देखील झाला आहे. सध्या पीक बघता निसर्गाने साथ दिल्यास यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पन्न प्रचंड वाढणार आहे. उत्पादन वाढल्यास भाव टिकून राहतील की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम