उस्मानाबादमध्ये शेत -पाणंद रस्ता बांधणी सुरू

0
43

उस्मानाबाद प्रतिनिधी : चार महिन्यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारने मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेमार्फत शेत रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला शेतकऱ्यांची चिंता दुर होणार आहे. शेतरस्ते अभावी शेतीमालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे, शिवाय ऊसासारखे नगदी पीकही केवळ वाहतूकीच्या अडचणीमुळे घेता येत नाही. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे करणे अत्यावश्यक होते. पण आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला अखेर सुरुवात होणार. याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील मान हा उस्मानाबाद जिल्ह्यातील 64 रस्त्यांना मिळाला आहे. शिवाय त्याकरिता प्रति किलोमीटरसाठी 24 लाखाचा निधी असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. शिवाय एमआरईजीएसच्या कुशल-अकुशल नियमांच्या जाळ्यतून पाणंद रस्त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था खालावल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात पायी मार्गस्थ होणेही अवघड झाले होते. शेतीमालाची वाहतूकही करता येत नसल्याने मोठे नुकसान व्हायचे. परंतु आता मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील 64 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूरी मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शेकडो शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण 7 तालुक्यांमध्ये हे रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक रस्ते कळंब तालुक्यात 28 , उमरगा 18, तुळजापूर 5, भूम 03, उस्मानाबाद 3 आणि लोहारा 4 आणि वाशी तालुक्यातील रस्त्यांची संख्या आहे 03 यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतरस्ते मोकळे करण्याची मोहीम राबवण्यास सुरूवात केल्याने या योजनेला अधिक बळ मिळाले आहे.आधी एमआरईजीएस अंतर्गत एका किलोमीटरसाठी 5 लाख रुपयेही मिळत नव्हते. पण, या योजनेतून भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे शेतरस्त्यांचे काम हे दर्जेदार होणार आहे असे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here